डॉ. अनिल अवचट याचे मत
ज्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध होते, तोच खरा आनंद आहे. व्यसनातून मिळणारा आनंद हा खोटा असून एकप्रकारे तो छुपा शत्रूच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, लेखक आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांनी ठाणे येथे केले.
येथीस ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित ‘स. वि. कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेत’ ते बोलत होते. त्यांनी ‘आजची तरुणाई’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश प्रधान, प्राचार्या डॉ. नीता साने, उपमहापौर मिलिंद पाटणकर, दाऊद दळवी आणि सदाशिव टेटविलकर उपस्थित होते.
तरुण वय म्हणजे आयुष्यातील भावी वाटचालीचा पाया असून या वयात चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टींची सवय लागते, अशा वेळी चांगल्या गोष्टी आचरणात आणून पुढील आयुष्याचा पाया भक्कम करा, असा प्रेमळ सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. दारू, सिगरेट यांसारख्या क्षुद्र गोष्टींसाठी आपले आयुष्य वाया घालवू नका, असे आवाहन अवचट यांनी विद्यार्थ्यांना केले. या वयात एखादी गोष्ट करावी की नाही याचा शांतपणे विचार करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. व्यसनामुळे आपल्या कुटुंबाचेही नुकसान होत असते. तरुण वयात ‘व्यसन’ या घातक गोष्टीपासून दूर राहा, असे त्यांनी सांगितले. या वेळी अवचट यांनी विद्यार्थ्यांना समाजसेवेकडे वळण्याचा सल्ला दिला. समाजात जी माणसे दडपली जात आहेत; अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गोष्टींपासून वंचित आहे, अशा व्यक्तींचे दु:ख दूर करा आणि समाजसेवेतून आनंद मिळवा असे त्यांनी सांगितले. संगणकावर गेम खेळून कृत्रिम आनंद मिळवण्यापेक्षा प्रत्यक्षात मैदानावर खेळून खेळाचा खरा आनंद लुटा, असे त्यांनी सांगितले. आयुष्यात कोणतीही गोष्ट करताना अंत:करणाचे ऐका, असेही त्यांनी सांगितले. आपण काय करतोय? कशासाठी करतोय? पुढे याचा काय उपयोग होईल? या गोष्टींकडे कायम लक्ष द्या, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आयुष्यात जोडीदाराची निवड करताना नुसत्या सौंदर्याच्या मागे न धावता गुणांच्या सौंदर्याला महत्त्व द्या, असेही त्यांनी सांगितले. तसेच तंत्रज्ञान आणि शिक्षण यांचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करावा, असे त्यांनी सांगितले. या वेळी अवचट यांनी पालकांनी मुलांना वेळ देऊन त्यांचा आनंद जपण्याचे आवाहन केले.