लग्नाचे आमिष दाखवून प्रियकरानेच विकल्याचे स्पष्ट
लग्नाचे आमिष दाखवून महाविद्यालयातूनच पळवून नेऊन नंतर दलालाला विकलेल्या एका उच्चशिक्षित तरुणीसह एका अल्पवयीन मुलीची पोलिसांनी गुरुवारी कुंटणखान्यातून सुटका केली. उत्तरांचल येथून आणलेल्या या तरुणीला एक वर्षांपूर्वी कुंटखान्यात आणले होते, तर अल्पवयीन मुलगी बिहारमधील असून, आठ महिन्यांपूर्वी तिला विकण्यात आले होते.
सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी बुधवार पेठेतील ‘चांदणी’ इमारतीत ही कारवाई केली. या प्रकरणी कुंटणखान्यातील दोन महिलांना अटक करण्यात आली असून, सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमा रामबहाद्दूर राही (वय ३५) व सीमा अजय थापा (वय ४०) यांना अटक करण्यात आली आहे. कुंटणखान्याची मालक अनिता तमांग हिच्यासह उच्चशिक्षित तरुणीला पळवून आणणारा अनिल (पूर्ण नाव व पत्ता नाही), तसेच अल्पवयीन मुलीला पळवून आणणारा रविंदर यादव (पूर्ण नाव व पत्ता नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेली तरुणी उत्तरांचल येथील एका महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या शेवटच्या वर्षांला शिकत होती. अनिल नावाच्या एका तरुणाशी तिची मैत्री झाली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून बरोबर पळून येण्यास तयार केले. ती त्याच्यासोबत आल्यानंतर तो तिला घेऊन गोरखपूर येथे आला व तिला एका दलालाला विकले. या दलालाने तिला एक वर्षांपूर्वी अनिता तमांग हिला विकले. दुसरी अल्पवयीन मुलगी बिहारमधील आहे. महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी भावासमवेत जात असताना रविंदर यादव नावाच्या तरुणाने साथीदारांसह येऊन तिला पळवून नेले होते. तिच्या भावालाही त्याने नेले, मात्र तो कुठे आहे, हे अद्याप कळालेले नाही. या मुलीलाही दलालाच्या माध्यमातून तमांग हिच्या कुंटणखान्यात विकण्यात आले होते. या दोघींबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दुपारी छापा टाकून दोघींची सुटका केली.