साकरीटोला जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एस.टी.बस स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही सालेकसा तालुक्यातील अनेक गावात पोहोचलीच नाही. ती अडली कुठे? असा प्रश्न मात्र, अनुत्तरित आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधींना लोक कुठल्या समस्यांचा सामना करतात, याचा विसर पडला आहे.आमगाव व सालेकसा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांवर एस.टी. महामंडळाची सेवा फोल ठरल्याने पायपीट करण्याची वेळ आली आहे.
गोंदिया जिल्ह्य़ातील सालेकसा तालुका आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. विकासाच्या तुलनेत सुद्धा तालुका मागासलेला असून, येथील अनेक गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. नक्षलग्रस्त भागांसाठी मिळणाऱ्या निधीअंतर्गत आमगाव-सालेकसा तालुक्यातील लहान-लहान गावात पक्क्या रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. देवरी-आमगाव व सालेकसा हे तिन्ही तालुके एकमेकांना जोडले आहेत. मात्र, या तिन्ही तालुक्यांच्या अनेक गावात आजपर्यंत एस.टी.सेवा पुरविण्यात आलेली नाही. सालेकसा तालुक्यातील भजेपार, माताटोला, गिरोला, बोदलबोडी, तिरखेडी, गांधीटोला, चर्जेटोला, लोहारा, सातगाव, मरकाखांदा, धानोली, दरबडा, यासह अनेक गावातील नागरिकांना त्यांच्या गावात एस.टी.चे दर्शन झालेले नाही.
तिन्ही तालुक्यातील मुख्य रस्त्यांना सोडून दूरवर असलेल्या गावांची लोकसंख्या जवळपास दोन लाखांच्या घरात आहे.नागरिकांना आजही विविध कामांसाठी पायदळ प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तालुकास्थळी दररोज पायदळ आणि सायकलने जावे लागत असून, मोफत बस पास सवलतींचा फायदा ते घेऊ शकत नाही. शेतकऱ्यांसह नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुकास्थळी असलेल्या कार्यालयाचा प्रवास देखील पायदळ करावा लागतो. ज्या गावात आजपावेतो एस.टी.धावली नाही. त्या गावात आजही प्रवाशासाठी बलबंडीचा वापर करावा लागतो. सालेकसा या अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील व मागासलेल्या तालुक्याची ही व्यथाच आहे.विशेष म्हणजे तिन्ही तालुक्यातील अनेक गावे दळणवळणाच्या दृष्टीने मागासलेली आहेत. राज्य परिवहन विभागांसह परिसरातील जनप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष आहे. जंगल परिसरात गावे असल्यामुळे नागरिकांना रात्री-बेरात्री धोकादायक पायदळ प्रवास करावा लागत असल्याने जीविताला हानी असल्याची संभावना असते.या गंभीर बाबीकडे स्थानिक जनप्रतिनिधींनी हिवाळी अधिवेशनात शासनाचे याकडे लक्ष वेधावे, अशी जनतेची अपेक्षा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Dec 2012 रोजी प्रकाशित
प्रवासाची पायपीट!
साकरीटोला जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एस.टी.बस स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही सालेकसा तालुक्यातील अनेक गावात पोहोचलीच नाही. ती अडली कुठे? असा प्रश्न मात्र, अनुत्तरित आहे.
First published on: 15-12-2012 at 01:34 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journey by walk