नागपूर शहराचे तिसावे पोलीस आयुक्त म्हणून ज्येष्ठ आयपीएस डॉ. कौशल के. पाठक यांनी शुक्रवारी सायंकाळी पदभार सांभाळला. शहरातील गुंडागर्दीवर नियंत्रण मिळविण्यास सर्वोच्च प्राधान्य राहील, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. डॉ. अंकुश धनविजय आज सेवानिवृत्त झाले. सायंकाळी त्यांनी नवनियुक्त पोलीस आयुक्त कौशल पाठक यांच्याकडे पदाची सूत्रे सोपविली. पोलीस आयुक्तालयात सायंकाळी धनविजय यांनी पुष्पगुच्छ देऊन पाठक यांचे स्वागत केले. पाठक यांनीही त्यांना पुष्पगुच्छ दिला. त्यानंतर पाठक यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला.
गुन्हे नियंत्रणासाठी गुंडागर्दीवर नियंत्रण मिळवावे लागेल. गुन्हे नियंत्रण तसेच गुन्यांचा तपास यास अर्थातच सर्वोच्च प्राधान्य राहील. कायद्याच्या चौकटीत राहूनच पोलीस काम करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहरात विविध ठिकाणी सी.सी. टीव्ही कॅमेरे बसवताना विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय साधावा लागेल. त्याआधी गृहमंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल. कारण, शेवटी सीसी कॅमेरे यंत्रणेसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष ठेवावा लागेल व त्याच्या नियंत्रणाची जबाबदारी पोलिसांकडेच ठेवावी लागते, असे एका प्रश्नाच्या उत्तरात नव्या पोलीस आयुक्तांनी सांगितले.याआधीचे पोलीस आयुक्त सत्यपालसिंह यांनी पोलीस शाळेची स्थापना केली होती. औरंगाबाद, पुणे, सोलापूर येथे अशा शाळा सुरू आहेत. तेथील कामाची माहिती घेऊन तसेच शिक्षण खात्याशी चर्चा करून नागपुरातही नक्कीच सुरू केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
 नवीन पोलीस ठाण्यांसाठी सुयोग्य जागा मिळाल्यानंतरच ती सुरू करता येतील. फायर रेंजसाठीसुद्धा मोठी जागा लागते. त्यासाठी जमीन मिळवावी लागेल, असे ते म्हणाले.
नागपुरात अधिकारी व कर्मचाऱ्यांची वानवा आहे. वरिष्ठांना याची कल्पना आहे. तरीही यासंबंधी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मूळचे आजमगड येथील कौशल पाठक यांनी ‘पर्यावरण प्रदूषण’ विषयावर पीएच.डी. केली आहे. सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनंत शिंदे, पोलीस उपायुक्त सुनील कोल्हे याप्रसंगी उपस्थित होते.