वैजापूर, निफाड, नाशिकचे आमदार विरोधी पक्षाचे असतानाही त्यांनी शेती व पिण्यासाठी भांडून पाणी मिळविले, मात्र कोपरगाव तालुक्याचे आमदार मी सत्तेत नाही, माझे कुणी ऐकत नाही, असे सांगत आपल्या नाकर्तेपणाचे तुणतुणे वाजवित बसल्याने कोपरगाव तालुक्यातील शेतीला पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही, अशी टीका प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव बिपीन कोल्हे यांनी आमदार अशोक काळे यांचे नाव न घेता केली.
तालुक्यातील मळेगावथडी येथील काळे गटाचे माजी सरपंच चांगदेव रंगनाथ दवंगे, ग्रामपंचायत सदस्य कांताराम रंगनाथ दवंगे यांनी यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह रामनवमीच्या मुहूर्तावर कोल्हे गटात प्रवेश केला, त्या प्रसंगी त्यांचा सत्कार करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजीमंत्री शंकरराव कोल्हे होते.
प्रारंभी, मळेगावथडी सोसायटीचे माजी अध्यक्ष संतोष लक्ष्मण दवंगे प्रास्ताविक करताना म्हणाले की, गोदाकाठाचे गाव व पिण्याचे पाण्याची योजना असताना मळेगावथडीवासीयांना पिण्याचे पाण्यासाठी शेजारच्या माहेगाव देशमुखला जावे लागते. ते देखील पाणी भरू देत नाहीत, अशी अवस्था आमची झाल्याने तातडीने पिण्याचे पाण्याचा टँकर सुरू करावा अशी मागणी करून, आजवर कोल्हे पितापुत्रांनी विविध योजनांमार्फत केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. सर्वश्री बापू खोंड, वैभव राजगुरु, बाळासाहेब शिंदे, राजेंद्र खोंड, हनुमंत दवंगे, बाजीराव रणशुर, भीमराव भूसे, पंचायत समिती सदस्य सुनील अंबादास देवकर आदींची भाषणे झाली.
या प्रसंगी संजीवनीचे उपाध्यक्ष विलासराव वाबळे, संचालक साहेबराव कदम, निवृत्ती बनकर, शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष अंबादास देवकर यांच्यासह मळेगावथडी पंचक्रोशीतील असंख्य मान्यवर उपस्थित होते. सत्कारास उत्तर देताना माजी सरपंच चांगदेव दवंगे म्हणाले की, खोटं बोल पण रेटून बोल, या पद्धतीला कंटाळून मी कोल्हे गटात प्रवेश केला असून नेत्यांचे बोट कार्यकर्त्यांच्या नाडीवर पाहिजे तरच गावचा विकास चांगला होतो.
बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, शेतीला पाण्याचे आवर्तन मिळावे यासाठी आम्ही थेट मंत्रालयापर्यंत धडका मारल्या. इंडियाबुल्स प्रकल्पाला पाणी देऊन गोदावरी कालवे आठमाही करण्याचा घाट घाटत आहे, असे असताना त्याबद्दल विधिमंडळात एक चकार शब्दही काढला जात नाही, तेव्हा या तालुक्याचे आम्ही वाळवंट केले, अशी टीका करणाऱ्यांनी गेल्या आठ वर्षांत कोणते नवे धरण बांधले, किती बंधारे बांधले, किती पाणीसाठा वाढविला याचा शोध घ्यावा. तालुक्याच्या दुरवस्थेला जबाबदार कोण? असेही ते शेवटी म्हणाले. माजीमंत्री शंकरराव कोल्हे अध्यक्षपदावरून म्हणाले की, पुढच्या हंगामात संजीवनी कोळपेवाडी कारखाने उसाअभावी बंद पडण्याच्या स्थितीत आहेत, दुष्काळ मोठा आहे, तालुका ओसाड पडत आहे, तरीही त्याचे गांभीर्य आपणाला नाही त्याबद्दल खंत वाटते. शेवटी बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Apr 2013 रोजी प्रकाशित
कोपरगावचे आमदार नाकर्ते असल्यानेच पाण्याचा प्रश्न उग्र – कोल्हे
आपल्या नाकर्तेपणाचे तुणतुणे वाजवित बसल्याने कोपरगाव तालुक्यातील शेतीला पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही, अशी टीका प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव बिपीन कोल्हे यांनी आमदार अशोक काळे यांचे नाव न घेता केली.
First published on: 21-04-2013 at 01:36 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kopargaon mla are inactive causing water problem bipin kolhe