अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थाची पोलीस यंत्रणेने कसोशीने तयारी सुरू केली असून रामकुंड परिसरासह शाही मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेचे सूक्ष्म पातळीवर नियोजनाचे काम नव्याने हाती घेण्यात आले आहे. शाही मार्गावरील धोकादायक इमारती, वेगवेगळ्या अडचणी, त्यामुळे उद्भवू शकणारे संभाव्य धोके, रस्त्यांची स्थिती, अतिक्रमणामुळे होणारा अडसर याचे ठिकठिकाणी पाहणी करून अवलोकन केले जात आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल लवकरच जिल्हा प्रशासन व महापालिकेला सादर करण्यात येणार आहे. वर्षभरापासून पोलीस यंत्रणा सिंहस्थ कामी धडपड करत असताना उर्वरित यंत्रणांना मात्र त्याचे फारसे सोयरसुतक नसल्याचे प्रकर्षांने पाहावयास मिळत आहे.
वर्षभरावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात याआधी वेगवेगळ्या त्रुटी समोर आल्या आहेत. साधुग्रामच्या जागेचा विषयही विविध पातळीवर रेंगाळत आहे. मागील सिंहस्थात शाही मार्गावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडून ३४ भाविकांना प्राण गमवावे लागले होते.
दाटीवाटीच्या भागातून मार्गस्थ होणाऱ्या जुन्या शाही मार्गाचा वापर करण्याचे सूतोवाच साधू-महंतांनी केले आहे. यामुळे गत वेळी निर्मिलेल्या नव्या शाही मार्गाचा वापर होणे दुष्कर आहे. रमणी समितीच्या शिफारशीनुसार जुन्या शाही मार्गाचे रुंदीकरण न झाल्यास हा मार्ग धोकादायक ठरू शकतो. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची भिस्त पोलीस यंत्रणेवर असली तरी या मार्गातील अडथळे व अवरोध दूर करण्याचे काम महापालिकेचे आहे. सिंहस्थ कामात २२ शासकीय विभाग सहभागी असून त्यांच्यातील असमन्वय वारंवार अधोरेखित होत आहे. सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्यासाठी सक्रिय झालेल्या शहर पोलीस आयुक्तालयाने वर्षभरापासून वेगवेगळ्या यंत्रणांशी समन्वय साधून आपले काम सुरू ठेवले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यास केवळ आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. निधी व तत्सम कारणांमुळे महापालिका शाही मार्गावरील अतिक्रमणे हटवून त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू करू शकलेली नाही.
या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणेने साधुग्राम ते रामकुंड परिसर या परिसरातील वेगवेगळ्या अडचणींचा पुन्हा अभ्यास सुरू केला आहे.  मध्यवस्तीत भरणाऱ्या कुंभमेळ्यासमोर अतिशय कमी उपलब्ध असलेली जागा ही न सोडविता येणारी समस्या आहे. पर्वणीच्या काळात गोदावरी पात्रात रामकुंड या एकाच परिसरात स्नानासाठी भाविकांची गर्दी उसळले. मध्यवस्तीतील नदीच्या पात्राकडे येणारे-जाणारे मार्ग एकच आहेत. यामुळे स्नानासाठी आलेले व स्नान करून जाणाऱ्या भाविकांची कोंडी टाळणे अवघड बनते. तसेच घाटाकडे अर्थात पात्राकडे येणारे सर्व मार्ग अतिशय अरुंद असल्याने लाखो भाविकांच्या सहभागामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता बळावते. गत वेळच्या सिंहस्थात गर्दीच्या व्यवस्थापनात काही त्रुटी राहिल्याने चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले होते. आगामी सिंहस्थात किती भाविक येणार याची आकडेवारी निश्चित नाही. गत वेळी ५० लाख भाविकांनी सहभाग नोंदविल्याचा संदर्भ घेऊन त्यात आणखी वाढ होईल हा अंदाज बांधून शासकीय यंत्रणा काम करत आहे. त्यात यंदा नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या शाहीस्नानाच्या दोन तिथी एकाच दिवशी येत असल्याने उपरोक्त दिवशी लाखो भाविक दोन्ही ठिकाणी स्नानाचा अपूर्व योग साधण्याचा प्रयत्न करतील. यामुळे उपरोक्त काळात ये-जा करणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन आणि जागेची मर्यादा हे पोलीस यंत्रणेसमोरील मुख्य आव्हान आहे. या परिसरात काही नव्या इमारतींची बांधकामे सुरू आहेत. अतिशय चिंचोळ्या रस्त्यावर नव्या इमारती उभारताना वाहन तळासाठी फारशी जागा सोडल्याचे दिसत नाही. या इमारतींच्या बांधकामांना परवानगी देताना नियमावलीचे पालन झाले की नाही याबद्दलही साशंकता आहे.  या पाश्र्वभूमीवर, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त अविनाश बारगळ, साहाय्यक पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणेने या संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण सुरू केले आहे. याआधी पोलीस यंत्रणेने शाही मार्गावरील त्रुटींकडे पालिकेचे लक्ष वेधले आहे. भाविक ज्या मार्गाने ये-जा करणार आहेत, त्या सर्व मार्गाचे अवलोकन केले जात आहे. त्या त्या ठिकाणी काय उपाय करणे आवश्यक आहे याची नोंद घेतली जात आहे. कन्नमवार पुलावरून नवीन घाट, शाही मार्ग, गंगा घाट व रामकुंड परिसराची पाहणी करीत पोलीस यंत्रणा कपालेश्वर येथून मालवीय चौकापर्यंत रस्ता कसा असणे आवश्यक आहे, रुंदीकरणाची आवश्यकता, अतिक्रमणे, पावसाळ्यात काय स्थिती राहील आदी मुद्दय़ांवर गांभीर्याने विचार करीत आहे. गर्दीचे नियोजन करताना परिसरातील स्थितीचे अवलोकन करून त्रुटींची माहिती संकलित केली जात आहे. मंगळवापर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्णत्वास जाणार असून त्यानंतर अहवाल संबंधित यंत्रणांना सादर केला जाणार असल्याचे डहाणे यांनी सांगितले.