प्रत्येकालाच सुखाची अपेक्षा असते. कथांचा शेवट सकारात्मक व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी माणसांमध्ये समजूतदार वृत्ती असणेदेखील गरजेचे आहे, असे प्रतिपादन लेखिका डॉ.विजया वाड यांनी व्यक्त केले. उद्वेली प्रकाशनच्या वतीने प्रकाशित केलेल्या ‘कथा फुलोरा’ व ‘कथा मोहोर’ या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या.
श्रीमती कमला कळके यांच्या ‘कथा फुलोरा’ व ‘कथा मोहोर’ या दोन कथासंग्रहांचे प्रकाशन नुकतेच ठाण्यातील सहयोग मंदिर सभागृहात झाले. लेखिका डॉ. विजय वाड, मेघना साने आणि विवेक मेहेत्रे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी डॉ. विजया वाड यांनी पुस्तकाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. सकारात्मक वृत्ती आणि मराठीचा गजर पुस्तकातून व्यक्त होत असून त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. एकच मोठे साहित्य संमेलन न होता जागोजागी छोटीछोटी साहित्य संमेलने व्हावीत. ज्यामुळे तरुणाई वाचन आणि लिहिण्याकडे देखील वळू शकेल, असे वाड म्हणाल्या.  कुटुंबावर जर समस्यारूपी उन्हाच्या झळा पडल्या तर आपल्या सद्विचारांची छत्री उघडा, असे विचार मांडणाऱ्या कथा कमला कळके यांनी लिहिल्या आहेत, असे मेघना साने यांनी सांगितले. आजच्या मालिकांमधून जे काही दाखवले जाते तशी पात्रे नकारात्मक गोष्टीच पेरणारी आहेत, असे मत उद्वेली बुक्सच्या विवेक मेहेत्रे यांनी व्यक्त केले.