वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेश काँग्रेस समितीने चारूलता टोकस आणि सागर मेघे या दोन नावाची शिफोरस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक मंडळाकडे केल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली असून, यावेळी काँग्रेसकडून नवा चेहरा येणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
जिल्हा व प्रदेश पातळीवरून संभाव्य इच्छुकांनी नावे पाठविण्याचा सोपस्कार काँग्रेसकडून सुरू झाला आहे. वर्षभरापूर्वीच निवडणूकीच्या तयारीची सुरूवात करण्याचा सपा, बसपा व भाजपच्या फं डयाचे यावेळी काँग्रेसचेही अनुकरण केले आहे. विद्यमान खासदार दत्ता मेघे यांनी स्वत: निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करीत पुत्र सागरचे नाव पक्षाकडे रेटणे सुरू केले आहे. दोनच दिवसापूर्वी सागर मेघेंनी वर्धा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढण्याची इच्छा प्रथमच जाहीरपणे व्यक्त करीत रिंगणात उतरण्याचे संकेत दिले होते.
पक्षाच्या दिवंगत नेत्या प्रभाताई राव यांची धाकटी कन्या चारूलता टोकस यांनीही वर्धा लोकसभा मतदारसंघावर दावेदारी केली आहे. गतवेळीही त्या इच्छुक होत्या. त्यामुळे दत्ता मेघेंना वर्धेतून उमेदवारी मिळण्यात मोठा अडथळा आला होता. ही बाब खुद्द दिवं. विलासराव देशमुख यांनी मेघेंच्या वध्र्यातील सत्कारप्रसंगी व्यक्त केली होती. मेघेंचे ईलेक्टिव मेरीट, विविध यंत्रणांच्या माध्यमातून श्रेष्ठीकडे आलेले अहवाल तसेच विलासराव देशमुखांचे वजन त्यांना उमेदवारी मिळवून देणारे ठरले होते. विलासराव आणि प्रभाताई आता हयात नाही. उभयतांचे पक्षांतर्गत कट्टर वैर संपले आहे. मात्र, वर्धेत मेघे आणि प्रभाराव यांच्यातील राजकीय वैर संपलेले नाही. या पाश्र्वभूमीवर परत मेघे-राव कुटुंबांचे वारस उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. प्रदेश समितीने सागर मेघे आणि चारूलता राव यांची शिफोरस केल्याने हे स्पष्ट झाले आहे. अशी शिफोरस करण्यात आल्याच्या वृत्ताला चारुलता टोकस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेईल. प्रत्येक कार्यकर्त्यांला पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. गतवेळी तिकीट मिळविण्यात अपयशी ठरले. यावेळी परत प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.
या दोन्ही कुटूंबाचे गॉडफोदर आता बदललेले आहेत ही बाबसुध्दा उघड आहे. सागर मेघेंना व्हाया राजेंद्र मुळक मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद अपेक्षित आहे. मेघे कुटुंबाची भिस्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवरच आहे. जिल्हा पक्षसंघटना तसेच विविध समित्यांवर राज्यमंत्री रणजित कांबळे यांचा वरचष्मा दिसून येताच  दत्ता मेघेंनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत न्याय मिळविला होता. आताही तिकिट प्राप्तीसाठी मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी साकडे घातल्याचे समजते. दुसरीकडे चारुलता टोकस यांना दिल्ली दरबारातील सोनियांच्या निकटस्थांचा आशीर्वाद असल्याने त्यांची दावेदारी प्रबळ झाली आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदी विलासराव देशमुख असताना तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रभाताई राव आणि पक्षप्रभारी मार्गारेट अल्वा यांनी एकत्र येऊन विलासरावांना जेरीस आणल्याची बाब काँग्रेस नेते निदर्शनास आणून देतात. या दोघींच्या त्यावेळच्या ‘सख्याची’ आठवण त्यामुळे केली जात आहे. आता राजस्थानच्या राज्यपाल असणाऱ्या मार्गारेट अल्वा या प्रभाताई रावांची सुपुत्री चारूलताच्या पाठिशी असल्याचे उघड असून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचेही चारूलतांना समर्थन असल्याचे सांगितले जाते.
वर्षभरानंतरच पत्ते उघड होतील. मात्र या दोन इच्छुकांपैकी एक राहील, हे जवळपास निश्चित समजले जाते. कारण सागर नको तर तुम्हीच परत लढा असे खा.मेघेंना ऐकायला मिळण्याची शक्यताही नाकारल्या जात नाही. वध्र्याचा सातबारा काय मेघे कुटुंबाच्या नावे पक्षाने केला आहे का? असा उपरोधिक सवाल टोकस समर्थकांनी केला आहे. सागर आणि चारूलता या दोघांनाही वर्धा लोकसभा मतदारसंघ नवा नाही. सागरने वडिलासाठी तर चारुलतांनी आईसाठी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला असल्याने त्याची खडानखडा माहिती दोघांनाही आहे. मेघेंची खरी निवडणूक सागरच लढतात. हे कुणीही काँग्रेस नेता स्पष्ट सांगतो. चारूलता यांनी आईच्या निवडणूकीवेळी तसेच मावसभाऊ रणजित कांबळे यांच्या निवडणुकीत आणि समर्थकांसाठी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचारकार्य हाताळले आहे. दोन्ही उमेदवारांकडे  निवडणूक जिंकण्यासाठी लागणाऱ्या सामुग्रीचे ‘कोठार’ तुडूंब भरले आहे. संघटनेची फ ळी टोकसकडे तर संस्थात्मक कार्यकर्ते व उपकृत हिंतचिंतकांचा ताफो मेघेंकडे सज्ज आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघाने दरवेळी नवा चेहरा देण्याची परंपरा सुरू केल्याचे गेल्या सात निवडणुकांमधून दिसून आले आहे. यावेळीही काँग्रेसतर्फे आडयातूनच पोहऱ्यात येणारे नाव असले तरी चेहरा नवा राहील, याचे संकेत स्पष्टपणे मिळाले आहेत.