प्रश्नपत्रिकेबाबत एसएमएस येणे मात्र सुरूच
पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे पेपर फुटल्याच्या शक्यतेची अधिक चौकशी करण्याकरिता समिती नेमण्यात आली असल्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी बुधवारी सांगितले. दरम्यान, काही विद्यार्थ्यांना मंगळवारी रात्रीसुद्धा दुसऱ्या दिवशीच्या प्रश्नपत्रिकेबाबतचा एसएमएस आला होता. मात्र, त्यातुलनेत दुसऱ्या दिवसाची प्रश्नपत्रिका पूर्णपणे वेगळी होती.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेचा फायनान्स मॅनेजमेंट स्पेशलायझेशनच्या ‘डायरेक्ट टॅक्सेशन’ या विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा मंगळवारी विद्यार्थ्यांमध्ये होती. पेपरच्या आदल्या दिवशी रात्री अकरानंतर एसएमएसने प्रश्नपत्रिका मिळत होती. काही विद्यार्थ्यांनी माध्यमांशी संपर्क साधून या प्रकाराबद्दल माहिती दिली. दुसऱ्या दिवशीच्या परीक्षेमध्ये अभ्यासक्रमातील कोणत्या मुद्दय़ावर प्रश्न विचारण्यात येणार आहेत, त्याबाबतचा एसएमएस आदल्या रात्री मिळत होता, असे विद्यार्थ्यांनी सांगितले होते.
मंगळवारी झालेल्या ‘डायरेक्ट टॅक्सेशन’ या विषयाच्या संपूर्ण अभ्यासक्रमामधील कोणत्या मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यात येणार आहेत, त्याबाबतचा एसएमएस सोमवारी रात्री विद्यार्थ्यांना मिळाला. प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेमध्ये सत्तर पैकी चाळीस गुणांचे प्रश्न एसएमएसनुसार आलेल्या मुद्दय़ांवर (टॉपिक्स) विचारण्यात आले होते.
या सर्व प्रकारातील सत्यता पडताळण्यासाठी विद्यापीठाने चौकशी समिती नेमली असून एका आठवडय़ामध्ये या समितीने त्यांचा अहवाल सादर करायचा आहे.
याबाबत कुलगुरू म्हणाले, ‘‘आलेल्या एसएमएसमध्ये फक्त टॉपिक सांगितले होते. मात्र, त्यावर प्रत्यक्ष प्रश्न काय येणार याबाबत काही माहिती नव्हती. त्यामुळे पेपर फुटलेले नाहीत असे मला वाटते आहे. परंतु या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. याबाबत कोणतीही शंका राहू नये, यासाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत पुढील निर्णय घेण्यात येतील.’’
एसएमएस आला पण पेपर वेगळाच..
बुधवारी होणाऱ्या प्रश्नपत्रिकेत कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात येणार आहेत, त्याचा एसएमएस विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री मिळाला.
मात्र, बुधवारी समोर आलेली प्रश्नपत्रिका पूर्ण वेगळीच होती. त्यामुळे आधीच्या पाच पेपरला आदल्या दिवशी रात्री एसएमएस आल्यानंतर तेवढय़ाच टॉपिकचा अभ्यास करणाऱ्यांची पंचाईत झाली.
याबाबत विद्यार्थ्यांनी सांगितले, ‘‘पहिल्या पेपरच्या आधी एसएमएस आला, त्यावेळी आम्ही फारसे लक्ष दिले नाही. मात्र, दुसऱ्या पेपरच्या आदल्या दिवशीही एसएमएस आला आणि त्यानुसारच दुसरा पेपरही होता. त्यानंतर सगळेच पेपर आदल्या दिवशीच्या एसएमएस प्रमाणे होते. मात्र बुधवारी झालेला पेपर मात्र अजिबातच एसएमएसप्रमाणे नव्हता.’’