नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत दोन महिलांचा अपवाद वगळता एकाही महिलेला संसदेत जायची संधी मिळाली नसून पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताला ही बाब शोभेची नक्कीच नाही.
नागपूर लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत १९५२ व १९५७ अशा फक्त दोनवेळा अनसूयाबाई काळे यांच्या रूपाने एका महिलेला काँग्रेसने संसदेत पाठविले आहे. १९९६ मध्ये काँग्रेसने कुंदाताई विजयकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपचे बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांचा पराभव केला. रामटेक लोकसभा मतदारसंघातून संसदेत जाणाऱ्या राणी चित्रलेखा भोसले या एकमेव महिला ठरल्या आहेत. त्यांनाही काँग्रेसनेच संसदेत पाठविले. १९९८ मध्ये त्या निवडून आल्या. २००४ मध्ये रामटेकमधून व्हीजेसी या पक्षाने नयना धवड, २००९ मध्ये बहुजन रिपब्लिकन एकता मंचने सुलेखा कुंभारे, डीएसईपी पक्षाने सीमा रामटेके यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर एकाही राजकीय पक्षाने तुरळक अपवाद सोडल्यास महिलेला नागपूर वा रामटेकमधून उमेदवारी दिलेली नाही वा महिलांचा विचार केलेला नाही, असे दिसून येते. आम आदमी पक्षाने मात्र यंदा अंजली दमानिया या महिलेला उमेदवारी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू झाले. त्यामुळे महिलांची संख्या प्रभावी दिसते. मात्र, लोकसभा निवडणुकीत असे कधीही झालेले नाही. संसदेत त्या मानाने महिलांचे प्रमाण कमीच दिसते. नागपुरातील एकाही पक्षाने वा महिला संघटनांनी राजकारणात महिलांचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेले नाहीत, असेच या महिलांच्या अत्यल्प प्रमाणावरून दिसते. महिलांचे मेळावे घेतले जातात. मात्र, निवडणुकीशी संबंधित महिलांना माहिती देणे, त्यांच्या जबाबदाऱ्या, समाजाला दिशा देऊ शकतील, अशा महिलांचा शोध याचा कोणीही विचार केलेला दिसत नाही. नाममात्र झालेल्या महिला मेळाव्यांचे स्वरूप शक्तिप्रदर्शन वा राजकीय असते.
संसदेसाठी महिलांना उमेदवारी देण्याचे आव्हान या राजकीय पक्षांसमोर आहे का असा प्रश्न पडतो. त्यातल्या त्यात काँग्रेस आणि भाजपची स्थिती थोडी बरी आहे. या पक्षांचा जनाधार असल्याने उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असली तरी ती स्थानिक स्वराज्य संस्था आणि आमदारकीसाठीच. राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांनी नागपूर वा रामटेकमधून लोकसभेसाठी महिलांचा विचारच केलेला नसल्याचे दिसते. निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची बाब सक्षम महिला उमेदवार. चांगला जनाधार असलेल्या उमेदवाराला तारण्यासाठी प्रभावी महिलांचा शोध ही सर्व पक्षांची
सर्वात मोठी डोकेदुखी आहे. महिला उमेदवार योग्य नसल्यास त्याचा फटका सहकारी उमेदवाराला बसून त्याचा लाभ प्रतिस्पध्र्याला मिळण्याचा धोका सर्वानाच सतावत आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात राजकीय महिला निवडून येण्याची शक्यता कमी असल्याची भीती या राजकीय पक्षांना असावी.