वाढत्या तापमानामुळे आंबिया बहराची मोठी गळती
विदर्भातील संत्रीबागांना वाढत्या तापमानाचा फटका बसला असून आंबिया बहराची मोठय़ा प्रमाणावर गळती होत आहे. एकीकडे फळ पीकविमा योजनेतील अटी आणि नुकसानभरपाई मिळवून देण्यात यंत्रणांची कुचराई या कात्रीत संत्रीउत्पादक शेतकरी अडकले आहेत. लाखो रुपयांचे नुकसान होऊनही शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. यात नागपूर व अमरावती जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात पारा ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असताना त्याचा विपरित परिणाम संत्रीबागांवर झाला आहे. अतिउष्णतेमुळे संत्र्यांच्या आंबिया बहराला गळती लागली. मोठय़ा प्रमाणावर छोटय़ा आकाराची संत्री गळून पडण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसात तापमानात काही अंशी घट झाली असली, तरी गळती थांबलेली नाही. वीस वर्षांपूर्वी विदर्भात संत्र्यांची अडीच कोटी झाडे होती. संत्र्याची बाग हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले गेले होते. शेतकऱ्यांनाही चांगला फायदा होत होता. पण, काही वर्षांतच स्थिती पालटली. प्रचंड प्रमाणात पाण्याचा उपसा झाल्याने विहिरी आटल्या. त्यातच विजेच्या भारनियमनाचा परिणाम झाला. उरलेली कसर डिंक्या रोगाने भरून काढली. मोठय़ा प्रमणावर झाडे वाळली. शेतकऱ्यांना बागा तोडून जळाऊ लाकडासाठी विकाव्या लागल्या. विदर्भातील संत्री बागांचे क्षेत्र ३ लाख हेक्टपर्यंत पोहोचले होते, ते आता केवळ ९३ हजार हेक्टपर्यंत स्थिरावले आहे. यातील सुमारे ७४ हजार हेक्टर क्षेत्र नागपूर आणि अमरावती जिल्ह्य़ात आहे. गेल्या दहा वर्षांत २ कोटींवर संत्री झाडे नष्ट झाली आहेत.
आता शिल्लक असलेल्या बागांवर वाढत्या तापमानाचे संकट उभे ठाकले आहे. अत्याधिक तापमान संत्र्याच्या झाडाला मानवत नाही आणि बहर गळून पडतो. यंदा अधिक तापमानाचे दिवस लांबल्याने गळती मोठय़ा प्रमाणावर झाली. परिणामी, संत्रीबागांचे अस्तित्वच संकटात सापडले आहे. शेतकऱ्यांनी जमिनीवर आच्छादने टाकून जमीन थंड ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण, या तात्पुरत्या उपाययोजनांचा काहीच फायदा झालेला नाही. आंबिया बहराच्या संत्रा फळ पिकासाठी १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत कोणत्याही सलग तीन दिवस ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असल्यास प्रती हेक्टरी १२ हजार रुपये नुकसानभरपाई विमा कंपन्यांकडून दिली जावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. मात्र, हवामानाच्या नोंदींबाबत संभ्रम निर्माण केला जातो. स्वयंचलित हवामान केंद्रात नोंदवली जाणारी माहिती दर आठवडय़ाला फलोत्पादन विभागाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची आहे. पण, तसे केले जात नाही. तापमानाच्या नोंदी व्यवस्थित घेतल्या जात नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहतात, असे संत्री उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आंबिया बहराच्या गळतीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे विम्याच्या रकमेचे वितरण त्वरित केले जावे, अशी मागणी माजी मंत्री आणि महाराष्ट्र राज्य संत्री उत्पादक महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केली आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये वरूड तालुक्यात संत्रा पिकासाठी हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा योजना लागू करण्याविषयी शासन निर्णय काढण्यात आला होता. या योजनेत शेतकऱ्यांनी लक्षणीय सहभाग घेतला. यात अवेळी येणारा पाऊस, बदलते तापमान, वातावरणातील बदलांमुळे बहर गळून पडणे, बहर फुटण्यास विलंब लागणे यासाठी नुकसानभरपाई देण्याची तरतूद होती. यंदा अतितापमानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तातडीने मिळावी, अशी हर्षवर्धन देशमुख यांची मागणी आहे.