विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे तरुणांना आकर्षित करण्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने डोंबिवलीतील फडके, मानपाडा रस्त्यांवर वायफाय यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. फडके रस्त्यावर दिवाळी, नववर्ष स्वागत यात्रेच्या दिवशी तरुणांचा जल्लोष असतो. या मार्गावर असलेला तरुणांचा वावर लक्षात घेऊन तेथेच वायफाय सेवा सुरू करण्याचा मनसेचा बेत आहे.
अत्यावश्यक परवानग्या घेतल्यानंतर वायफाय यंत्रणा बसवण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. प्रत्येक घरात इंटरनेट आले आहे. तरुणांमध्ये इंटरनेटचा सर्वाधिक वापर होत आहे. फडके, मानपाडा हे डोंबिवलील प्रमुख रस्ते असून या रस्त्यांवर तरुणांचा सर्वाधिक वावर असतो. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर या भागात वायफाय यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहराच्या अन्य भागांचा विचार करू, असे या पक्षाचे म्हणणे आहे.