लोकवस्तीच्या परिसरात भरमसाठ मोबाईल टॉवर उभारण्याविरोधात चळवळ आणि जनजागृती मोहीम राबवल्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला हिने मोबाईल फोनच्या सुरक्षित वापराचा मुद्दा हाती घेतला आहे. मोबाईल फोनमधून बाहेर पडणाऱ्या लहरींमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता ते टाळण्यासाठी हा फोन वापरण्याबद्दलच्या सूचना आणि धोक्याचा इशारा मोबाईल फोनच्या बॉक्ससह द्यायला हव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मोबाईल फोनचा वापर आजच्या काळात अपरिहार्य आहे. त्यामुळे लोकांनी मोबाईल वापरूच नये वा त्याचे टॉवर असू नयेत, असे कोणी म्हणू शकणार नाही. मात्र फोन वापरताना आणि टॉवर बांधताना लोकांच्या आरोग्याला हानी होणार नाही याचा विचार आवश्यक आहे, असे सांगत मोबाईल वापरताना काळजी घ्या, असे आवाहन जुहीने केले. तर मोबाईल फोन हा आरोग्याला हानीकारक नसेल तर ‘शक्यतो लँडलाइन’चा वापर करा, असे दूरसंचार विभाग आपल्या जाहिरातीत का म्हणतो? असा सवाल जुहीचे चळवळीतील सहकारी प्रकाश मुन्शी यांनी केला.
मोबाईल फोनची सुरुवात झाली तेव्हा त्यांचा वापर अल्प होता. वापरणाऱ्यांची संख्याही खूप कमी होती. पण आता दोन्हीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे मोबाईल फोन आणि टॉवरमधून निघणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींचे वातावरणातील प्रमाण खूप वाढले आहे. त्यातूनच ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ने मे २०११ मध्ये ‘मोबाईल फोन वा टॉवरमधून निघणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींमुळे कर्करोग होऊ शकतो’ असा अहवाल दिला होता याकडेही जुहीने लक्ष वेधले.
मुंबईतील जवळपास निम्मे मोबाईल टॉवर हे अनधिकृत आहेत हे खुद्द महानगरपालिकाच मान्य करते. मग ते काढण्याची कारवाई करण्यासाठी उपाययोजना का नाही करत, असा उद्विग्न सवालही जुहीने केला.
जुहीचे आवाहन
लहान मुलांच्या चेहऱ्याची हाडे नाजूक असतात. मोबाईलच्या लहरींमुळे त्यांना जास्त त्रास होतो. त्यामुळे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा, ते खेळायला देऊ नका.
मोबाईल वरच्या खिशात ठेवू नका. वापरात नसताना आपल्यापासून शक्य तितका दूर ठेवा.
कानाला लावून बोलू नका, थोडे अंतर ठेवा.
लिफ्ट वा बंद कारमध्ये मोबाईलवर बोलू नका, अशावेळी लहरी तीव्र होतात.