दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असतानाही पाणी पुरवठा टँकरचे प्रस्ताव तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांकडे पंधरा-पंधरा दिवस पडून रहात असल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत सदस्यांनी संताप व्यक्त केला. जामखेड शहराचे टँकरचे प्रस्ताव प्रलंबीत राहिल्याने ही बाब उघड झाली.
टँकर मंजुरीचे प्रस्ताव अनेक दिवस प्रलंबीत रहात असल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा निर्णय जि. प. अध्यक्ष विट्ठलराव लंघे यांनी सभेत जाहीर केला. जामखेडला पुरवठा करणाऱ्या भुतोडा तलावात केवळ ८ दिवस पुरेल इतकाच, तोही दुषित पाण्याचा असताना तसाच पुरवठा होत आहे. पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे, तरीही तहसीलदारांनी खोटी माहिती केंद्र सरकारच्या समितीस दिल्याची तक्रात राजेंद्र कोठारी यांनी केली. त्यास शारदा भोरे यांनी पाठिंबा दिला. जिल्ह्य़ात सध्या २३३ गावे, ९१२ वाडय़ांना २७६ टँकरमधुन पाणी पुरवठा सुरु आहे. १०४ गावे व ३४ वाडय़ांसाठी १४८ खासगी विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
ज्या प्रादेशिक पाणी योजनांमार्फत पाणी पुरवठा सुरु आहे, त्यातून टंचाईग्रस्त गावांना पुरवठा करण्यासाठी, योजनेत इतर गावांचा तात्पुरता समावेश करण्याची मागणी सुभाष पाटील यांनी केली, त्यावर लंघे यांनी मजिप्राला सर्वेक्षण करण्याची सुचना केली.
म्हस्केवाडी (पारनेर),राक्षसवाडी व कोपर्डी (कर्जत) येथील कोपरगाव पद्धतीच्या बंधाऱ्यांना तसेच जवळा (पारनेर),वांबोरी (राहुरी) व शिंगोरी (पाथर्डी) येथील साठवण बंधाऱ्यांना मंजुरी देण्यात आली. सभेत उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती कैलास वाकचौरे, शाहुराव घुटे, हर्षदा काकडे, सुनिल गडाख, केशव भवर आदी उपस्थित होते.
लंघेंचा लवकरच जिल्हा दौरा
पुढील तीन-चार महिन्यात टंचाई अधिक तीव्र होणार असल्याने जि. प. अध्यक्ष लंघे टँकर, पाणी पुरवठा योजना यातील अडचणींची दखल घेण्यासाठी तालुकानिहाय दौरे करणार आहेत, त्याची सुरुवात पुढील आठवडय़ापासून होईल, विशेषत: दक्षिणेतील तालुक्यात अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुपनलिकांऐवजी साठवण टाक्यांची मागणी
भुगर्भातील पाण्याची पातळी खोल गेल्याने कुपनलिकांना पाणी लागत नाही व त्या अयशस्वी होतात त्यामुळे टंचाई काळात ९६५ कुपनलिका खोदण्याचा व त्यावर होणारा ४ कोटी ५० लाख रुपये खर्च अनाठायी ठरणार आहे, त्यामुळे हा निधी इतर उपाययोजनांसाठी विशेषत: पाणी साठवण टाक्या घेण्यासाठी वापरावा, अशी मागणी बहुसंख्य सदस्यांनी केली. त्यावर लंघे भुजल सर्वेक्षण अधिकाऱ्यांना याबाबत सर्वेक्षण करण्याची सुचना केली.