पर्यावरणविषयक जनजागृतीच्या उद्देशाने, तसेच लातूर फेस्टिव्हलच्या पुढाकाराने गुरुवारी शहरात आयोजित ‘सायकल डे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिवसभर सायकलचा वापर केला.
स्वयंचलित वाहनांमुळे भीषण प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. यासंबंधी जनजागृतीच्या उद्देशाने सायकल डेचे आयोजन केले होते. लातूर फेस्टिव्हलच्या पुढाकाराने देशीकेंद्र विद्यालय, अभिनव अध्यापक महाविद्यालय, सरस्वती विद्यालय, राजस्थान विद्यालय, कॉक्सिट महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, गोदावरी विद्यालय अशा सुमारे ३० ठिकाणांहून सायकल फेरी काढण्यात आली.
विविध भागांतील १० हजारपेक्षा अधिक लोक सायकलफेरीत सहभागी झाले होते. मान्यवरांच्या हस्ते ठिकठिकाणी सायकलफेरीस प्रारंभ झाला. आदर्श कॉलनीतील कम्युनिटी हॉल येथे सायकलचे प्रदर्शन भरवण्यात आले. यात शंभर वर्षांतील विविध प्रकारच्या सायकली ठेवल्या होत्या.
सायंकाळी साडेचार वाजता आमदार अमित देशमुख यांनी टाऊल हॉल ते औसा रस्त्यावरील कम्युनिटी हॉलपर्यंत सायकलवर जाऊन प्रदर्शनाची पाहणी केली. जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, महापौर स्मिता खानापुरे, महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग, पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर, डॉ. ईश्वर राठोड, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक चिंचोले आदींनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. अध्यक्ष बनसोडे यांनी सायकलवरून कार्यालयात जाण्याचा आनंद घेतला. मनपा आयुक्त तेलंग, पोलीस अधीक्षक गायकर, पोलीस उपअधीक्षक तिरुपती काकडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्यासह फेस्टिव्हल संयोजन समिती अध्यक्ष संजय अयाचित, लक्ष्मीकांत कर्वा, ईश्वर बाहेती, सुपर्ण जगताप आदींनी सायकलचा वापर केला.