राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील पूर्णपणे कोरडे पडलेल्या तळ्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी भारतीय जैन संघटनेने मोहीम सुरू केली असून ती ७ जूनपर्यंत चालणार आहे. सध्या तलावातील गाळ काढण्यात मराठवाडा आघाडीवर आहे, अशी माहिती भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य महेंद्रकुमार एम. कटारिया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
राज्यातील छोटय़ा-मोठय़ा तलावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गाळ जमा झालेला आहे. यामुळे साठा कमी होत असल्याने पाण्याची टंचाई भासत आहे. आगामी काळात पावसाच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक झाले आहे. तलावातील पाणीसाठा वाढावा, या उद्देशाने ही मोहीम आखण्यात आली आहे. विदर्भ व मराठवाडय़ात तलावांतील गाळ काढण्याचे प्रमाण जास्त आहे. मराठवाडय़ात लोकसहभागातून सहाशेवर प्रकल्पांतून एक कोटीवर ब्रास गाळ उपसण्यात आला आहे. छोटय़ा तलावांतील गाळ काढून तो शेतात पसरविणे अत्यंत फायदेशीर असल्याचे महाराष्ट्र इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट व जलसंपदा विभागाने सूचविले आहे. भारतीय जैन संघटनेने दुसऱ्या टप्प्यात मराठवाडय़ातील ५० तलावांतील गाळ काढून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. तलावांतील गाळ उपसण्यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होणार असून जमिनीची सुपिकता वाढणार आहे.
तलावांच्या पुनरुज्जीवन योजनेसाठी भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील समस्त महाजन परिवार या संस्थेचे अध्यक्ष गिरीश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण पथकाने शासकीय अधिकाऱ्यांसोबत मराठवाडय़ातील तलावांची पाहणी केली. तळ्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी फारच कमी अवधी राहिलेला आहे. तलावातील गाळ काढण्यासाठी मशीनचा वापर करण्यात येत असला तरी या कामात जनतेचा सहभाग घेण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे लक्षात घेऊनच अक्षय्य तृतीयेला ‘चार दिवस दुष्काळासाठी’ ही योजना प्रारंभ करण्यात आली असून ७ जूनपर्यंत राबविली जाणार आहे. या राज्यातील लोकांनी ‘चार दिवस दुष्काळासाठी’ श्रमदान करावे, यासाठी येणाऱ्या लोकांनी संघटनेच्या बीड जिल्ह्य़ातील डोंगरकिन्ही येथील केंद्रीय कार्यालय किंवा पुणे येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन असे कटारिया यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2013 रोजी प्रकाशित
राज्यातील तळ्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष मोहीम
राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील पूर्णपणे कोरडे पडलेल्या तळ्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी भारतीय जैन संघटनेने मोहीम सुरू केली असून ती ७ जूनपर्यंत चालणार आहे. सध्या तलावातील गाळ काढण्यात मराठवाडा आघाडीवर आहे,
First published on: 24-05-2013 at 03:21 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special compaign for lake revival