महाराष्ट्रात एलबीटी लागू केल्याच्या विरोधात नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स स्थापित एलबीटी विरोधी संघर्ष समितीने १५ आणि १६ जुलैला व्यापार बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
व्यापारी बांधव आणि एनसीव्हीसीसी व फेडरेशन ऑफ असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत व्यापार बंद चा निर्णय घेतला. समितीचे समन्वयक रमेश मंत्री आणि असोसिएशनचे अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. फक्त महाराष्ट्रातच एलबीटी स्थानिक संस्था कर लागू करण्यात आले असून व्यापाऱ्यांचा भावना तसेच एलबीटीविषयी विचार करण्याविषयी महाराष्ट्र शासन गंभीर नाही, असा आरोप मोहन गुरनानी यांनी केला.    
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरली देवरा, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीदरम्यान एलबीटीला पर्याय शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण अशी कोणतीही समिती स्थापन करण्यात आली नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ आणि १६ जुलैला व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांनी अद्यापही एलबीटीचा स्वीकार केला नसून विविध व्यापारी संघटना या दोन दिवसीय बंद मध्ये सहभागी होऊन दुकाने बंद ठेवणार आहे, असे रमेश मंत्री यांनी सांगितले.