मुंबईवर झालेल्या ‘२६/११’च्या हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाबकडून जखमी झालेले पोलीस शिपाई अरुण जाधव यांनी ‘त्या’ वेळच्या आठवणी शालेय विद्यार्थ्यांसमोर जागवल्या. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘खाद्यजत्रे’तून मिळालेला निधी जाधव यांना सुपूर्द करण्यात आला. निमित्त होते ते दादर (पश्चिम) येथील विकास कर्णबधीर विद्यालय आणि सांताक्रूझ (पश्चिम) येथील राजा रामदेव पोदार शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन साजऱ्या केलेल्या खाद्यजत्रा या कार्यक्रमाचे..
राज्य विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड आणि आशा थत्ते यांनी दादर (पश्चिम) येथील महापालिकेच्या शाळेत हा उपक्रम आयोजित केला होता. कर्णबधीर आणि सर्वसामान्य विद्यार्थी एकत्र यावेत आणि त्यांच्यात संवाद साधला जावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्त्यां आशाताई कुलकर्णी यांच्या हस्ते या खाद्यजत्रेचे उद्घाटन झाले. ‘२६/११च्या हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाब याच्याकडून पोलीस हवालदार जाधव हे जखमी झाले होते. खाद्यजत्रा कार्यक्रमास जाधव उपस्थित होते. त्यांनी या विद्यार्थ्यांसमोर ‘त्या’ वेळच्या आठवणी जागवल्या.  
मोठी माणसे आमच्यासाठी काही ना काही करतात. आज आम्ही ठरवले की आमच्याकडून तुमच्या शौर्याला आणि तुम्हाला मानाचा मुजरा करायचा. आम्ही आज या खाद्यजत्रेतून मिळालेला निधी तुम्हाला देतोय. खूप आनंद वाटतोय, अशा शब्दात मुलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.