दाट लोकवस्तीचे शहर अशी ओळख असणाऱ्या ठाणे शहरातील रुग्णालयांच्या सुरक्षेबाबत महापालिका प्रशासनाने काटेकोर नियम केले असले तरी त्यांच्या अंमलबजावणीबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. शहरातील बहुतेक रुग्णालये भर वस्तीत आहेत. काही जुन्या-जीर्ण झालेल्या इमारतींतही आहेत. नियमाप्रमाणे रुग्णालये शांतता क्षेत्रात (सायलेन्स झोन) मोडतात. मात्र वर्दळीच्या रस्त्यांवर शांतता अबाधित राहणे अशक्य आहे. तिथे वाहतुकीचा कोलाहल गृहीतच धरावा लागतो. सार्वजनिक उत्सवांच्या काळात तर येथील रुग्णांना ध्वनिप्रदूषणामुळे बराच त्रास होतो.
नव्या मानकांनुसार प्रत्येक रुग्णालयात तीन लाख लिटर्स साठवण क्षमता असलेली पाण्याची टाकी बसविणे बंधकारक आहे. अर्थात अनेक रुग्णालयांना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा करणे शक्य नाही. नव्या रुग्णालयांमध्ये तशी व्यवस्था करणे शक्य असते, जुन्यांबाबत मर्यादा पडतात. मात्र इतर निकषांची मात्र काटेकोर अंमलबजावणी होत असल्याची माहिती मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. आर.टी. केंद्रे यांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रात ३५० रुग्णालये असून त्यांपैकी २५० रुग्णालयांची अग्नी सुरक्षा तपासणी  पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयांची अग्निशमन विभागाकडून दर सहा महिन्यांची तपासणी केली जाते. त्यानंतरच त्यांना सुरक्षेबाबतचे प्रमाणपत्र दिले जाते. मुख्य अग्निशमन अधिकारी ए.पी. मांडके यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै ते डिसेंबर-२०१२ या कालावधीत २९३ रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षेविषयक प्रणालींची तपासणी झाली. जानेवारी ते जून २०१३ या कालावधीत १३० रुग्णालयांची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर आतापर्यंत ९९ रुग्णालयांचे अग्निरोधक परीक्षण पूर्ण झाले आहे.