वटवाघळांच्या त्रासामुळे विद्यापीठाच्या कलिना संकुलातील तब्बल १५ झाडांची वाट्टेल तशी कत्तल करून ती उघडीबोडकी करण्याच्या प्रकरणात आता मुंबई विद्यापीठ आणि महानगरपालिका यांच्यातच आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरू झाला आहे. या कत्तलीसंदर्भात विद्यापीठातील संबंधितांवर ‘महाराष्ट्र वृक्ष संरक्षण आणि संवर्धन कायद्या’अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असे पालिकेने वाकोला पोलीस ठाण्याला कळविले आहे. तर ‘या वृक्षांची छाटणी पालिकेने मान्यता दिलेल्या कंत्राटदाराकरवी करण्यात आली आहे. त्यामुळे हे वृक्ष छिन्नविच्छिन्न करण्यासाठी जो काय दोष द्यायचा तो पालिकेने या कंत्राटदाराला द्यावा,’ असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.
वटवाघळांनी विद्यापीठातील या १५ झाडांवर वसाहत केली होती. रात्री-अपरात्री या वटवाघळांचा त्रास होतो म्हणून काही शिक्षकांनी या झाडांच्या फांद्या तोडण्याची विनंती विद्यापीठाकडे केली. त्यावर विद्यापीठाने या झाडांच्या फांद्या इतक्या कापल्या की ते वृक्ष केवळ बुंध्यापुरते उरले. झाडांच्या या कत्तलीला विद्यार्थी आणि शिक्षकांनी विरोध केल्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजले. आता या प्रकरणी पालिकेने विद्यापीठाला दोषी ठरवीत पोलिसांनाच या संबंधात कारवाई करण्याची विनंती केली आहे.
या झाडांच्या केवळ काही फांद्या छाटण्याची परवानगी आम्ही विद्यापीठाला दिली होती. परंतु, विद्यापीठाने हे वृक्ष पूर्णपणे बोडके करून टाकले आहेत, अशी पालिकेची यावर भूमिका आहे. विद्यापीठाला हे वृक्ष बोडके करण्यासाठीची परवानगी नव्हती. त्यामुळे, पालिकेने कारवाईचा बडगा उगारला. ‘आम्ही विद्यापीठाला दोन वेळा नोटीस पाठविली. त्याला विद्यापीठाने उत्तर न दिल्याने आम्ही वाकोला पोलिसांनाच या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे,’ असे पालिकेच्या ई-प्रभागाचे सहआयुक्त अजितकुमार अंबी यांनी सांगितले. १३ एप्रिलला या झाडांच्या सर्वच्या सर्व फांद्या कापून टाकण्यात आल्या होत्या.
या प्रकरणी सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर विद्यापीठाच्या कुलसचिवांनी आपल्या उद्यान विभागाच्या प्रमुखांकडून विस्तृत अहवाल मागविला. ‘वृक्षछाटणीसंदर्भात पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्यास आम्ही या कंत्राटदाराला सांगितले होते. त्याने त्याप्रमाणे काम केले की नाही हे ठरविण्याची तसेच या कंत्राटदारावर काय कारवाई करायची याची जबाबदारी आता पालिकेची आहे,’ असे या प्रकरणी विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. खान यांनी सांगितले. पालिकेच्या नोटिशीलाही आम्ही लवकरच उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. जितक्या झाडांचे नुकसान झाले आहे त्याच्या
दुप्पट संख्येने वृक्षारोपण करण्याची मोहीमही विद्यापीठातर्फे हाती घेतली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2014 रोजी प्रकाशित
झाडांची कत्तल विद्यापीठाला भोवणार!
वटवाघळांच्या त्रासामुळे विद्यापीठाच्या कलिना संकुलातील तब्बल १५ झाडांची वाट्टेल तशी कत्तल करून ती उघडीबोडकी करण्याच्या प्रकरणात आता मुंबई

First published on: 27-05-2014 at 06:25 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree cutting at mumbai university