महावितरणच्या स्थानिक प्रशासनाने मुंबई मुख्यालयाकडे नागपूर जिल्ह्य़ातील ‘दोन फिडर्स’ची वीजहानी कमी झाल्यामुळे त्यास ‘अपग्रेड’ करण्याचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास खापरखेडा पोल फॅक्ट्री आणि कन्हान ग्रामीण या दोन्ही फिडर्सला भारनियमनमुक्त केले जाईल. यामुळे नागपूर जिल्ह्य़ातील २० हजारच्यावर वीज ग्राहकांना याचा लाभ मिळेल.
महावितरणच्या वीजहानी जास्त असलेल्या फिडर्सवर भारनियमन जास्त या सूत्राचा लाभ आता वीजहानी कमी करण्याकरिता प्रयत्न करणाऱ्या वीज ग्राहकांना होत आहे. महावितरणने २०१२ एप्रिल मध्ये अ, ब आणि क गटातील  व ऑक्टोबर २०१२ मध्ये ड वर्गवारीतील फिडर्स भारनियमनमुक्त केले आहेत. नागपूर ग्रामीणचे खापरखेडा पोल फॅक्ट्री आणि कन्हान ग्रामीण हे दोन फिडर तेथील वीजहानी कमी झाल्यामुळे अपग्रेड करण्याचा  प्रस्ताव स्थानिक प्रशासनाने महावितरणच्या मुंबई मुख्यालयाला नुकताच पाठविला आहे.
नागपूर जिल्ह्य़ातील २० हजारापेक्षा जास्त वीज ग्राहकांना प्रस्ताव मंजूर  झाल्यास भारनियमनापासून मुक्ती मिळेल. राज्यात कृषीपंपाचे फिडर्स वगळता औद्योगिक व इतर ७८०० फिडर्स आहेत यापैकी ६५०० फिडर्स एप्रिल अखेर भारनियमनमुक्त असून १३०० फिडर्स भारनियमनात आहेत. सुमारे १७०० फिडर्सवर जानेवारी २०१३ ते एप्रिल २०१३ या चार महिन्यात मोठय़ा प्रमाणात काम झाले असून या कालावधीत सुमारे ४०० फिडर्स भारनियमनमुक्त झालेले आहेत. ई गटातील फिडर्स वरील हानी कमी झाल्यास ते फिडर्स ड गटात येऊन भारनियमनमुक्त होतील.
सध्या ५०० फिडर्स ई वर्गात आहेत. येत्या दोन महिन्यात हे फिडर्स  ड वर्गात येऊन भारनियमन मुक्त होण्याच्याच मार्गावर आहेत. यापैकी विदर्भातील ५० फिडर्स असून त्यातील दोन फिडर्स हे नागपूर ग्रामीणच असल्याची माहिती आहेत. महावितरणचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त हानी असलेले फिडर्स जी वर्गवारीत आहेत.
सुमारे ७०० फिडर्स जानेवारी २०१३ मध्ये या वर्गवारीत होते. एप्रिलमध्ये ही संख्या ५०० फिडर्सवर आलेली आहे. लोकांच्या सहभागामुळे व महावितरणच्या प्रयत्नामुळे हा बदल होत आहे.