वर्षांनुवर्षे शासनाशी हातमिळवणी करून मॅगनीजच्या व्यवहारात अतोनात पैसा कमावून वेळप्रसंगी शासनाला टोपी घालून १९६८-६९ मध्ये सुरू झालेला तुमसरजवळील युनिव्‍‌र्हसल फेरो अ‍ॅण्ड अलाईड केमिकल्स कारखाना ९ वर्षांपासून बंद आहे. १२०० कामगारांचे भवितव्य टांगणीवर आहे. यासोबतच शासनाचे कोटय़वधी रुपये बुडविण्यात या कारखान्याने कसर ठेवली नाही.
भूमी अधिग्रहण, पुनर्वसन व पुनव्र्यवस्थापन विधेयक २०११ ची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची तरतूद असतांना केन्द्राने व राज्य शासनाने कोणताही पुढाकार घेतलेला नाही. या कारखान्याने अधिग्रहित केलेली सुमारे ३०० हेक्टर जमीन पडून आहे. १९६८-६९ मध्ये भंडारा जिल्ह्य़ात मॅगनीज शुद्धीकरणाचा हा कारखाना सुरू झाला. वाजवीपेक्षा अधिकची जमीन शेतकऱ्यांकडून १९६५ च्या काळात घेतली गेली. प्रारंभीची ३० वर्षे या कारखान्याने भरपूर कमाई केली. कोटय़वधी रुपयांची विजेची बिले ‘अ‍ॅडजस्ट’ होत गेली. १९९६ मध्ये आणखी मोठे घबाड बाहेर आल्याने विजेची थकित रकम न भरल्याचे कारण देत वीज महामंडळाने या कारखान्याचा वीज पुरवठा खंडित केला होता. या कारखान्याला नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशनशी झालेला करार धुडकावत व्यवस्थापनाने विदेशात मॅगनीज पुरवठा केल्याने कार्पोरेशनने सवलतीच्या दरातील वीज पुरवठाही बंद केला. शासनाची पुन:मर्जी होईल ही व्यवस्थापनाला आशा होती, परंतु पूर्वीच अवैध सवलतीने आकंठ बुडालेल्या या कारखान्याला मदत मिळू शकली नाही. १९९६ मध्ये कारखाना बंद पडल्यावर व्यवस्थापनाने १९९८ पर्यंत १२०० कामगारांना ‘ले ऑफ’अंतर्गत अर्धा पगार दिला.खटाटोप करत पुन्हा ६ फेब्रुवारी १९९९ ला वीज महामंडळाने कारखान्याला २८ मेगॅव्ॉट वीज पुरवठा सुरू केला. पुन्हा २००३ पासून हा कारखाना बंद आहे.