संस्कृती टिकली तरच आम्ही मराठी आहोत म्हणून सांगता येईल. मराठी भाषा आपणच पुढे नेली पाहिजे, असे सांगून, आपल्या मुलांना मराठीतच शिक्षण द्या. अन्यथा आपणच मायमराठीचे मारेकरी होऊ, असा इशारा कौतिकराव ठाले पाटील यांनी पाचव्या शिवार साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी दिला. मराठी भाषेविषयी राज्यकर्ते उदासीन असून यशवंतराव चव्हाण हेच मराठी भाषेची जाण असणारे मुख्यमंत्री होते, असेही त्यांनी सांगितले.
माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे शार्दुलेश्वर साहित्यनगरीत ठाले पाटील यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलन पार पाडले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे, माजी आमदार मोहन सोळंके, कमलाकर सोळंके, कवी प्रभाकर साळेगांवकर, डॉ. सतीश साळुंके, कमलाकर कांबळे आदी उपस्थित होते. ठाले पाटील म्हणाले की, मराठी भाषेची पताका देशाबाहेर फडकवण्याचे कार्य सुरू आहे, त्याप्रमाणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मराठी भाषा पोहोचविण्यास शिवार साहित्य संमेलनातून मदत होते.
डॉ. वासुदेव मुलाटे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. रमेश गटकळ यांनी केले.