जिल्ह्य़ाच्या विकासास दिला जाणारा निधी मुदतीत खर्च न झाल्यास अडचणी निर्माण होतात. विकासासाठी दिलेला निधी वेळेत खर्च न होण्याचे गौडबंगाल काय, तेच कळत नाही, अशा शब्दांत जिल्हा प्रशासनाला फटकारताना निधी वेळेत खर्च करा, अशी ताकीद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिली.
नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या कल्याण मंडपम व सामाजिक सभागृहाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, राज्यमंत्री फौजिया खान, सुरेश धस, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, पंचायत राज्य समितीचे अध्यक्ष आमदार जयप्रकाश दांडेगावकर, भाऊ पाटील गोरेगावकर, विक्रम काळे, प्रदीप नाईक, बाबाजानी दुर्राणी आदींची उपस्थिती होती. नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी प्रास्ताविकात हिंगोली शहरातील समस्या व पाणीयोजनेचे काम पूर्ण करण्यास निधीसह अन्य योजनांच्या निधीस मागणीचे निवेदन पालिकेच्या वतीने मंत्र्यांना दिले.
हा धागा पकडून पवार म्हणाले की, वेळेत निधी खर्च न झाल्यास काय अडचणी निर्माण होतात, हे येथील प्रलंबित पाणीयोजनेच्या कामाचे उदाहरण आहे. ४६ कोटींची योजना आता ७२ कोटी खर्चावर गेली. पालिकेच्या करवसुलीतून एवढा निधी उभारता येत नसल्याचे नगराध्यक्ष चव्हाण सांगतात व वाढीव २५ कोटींच्या निधीची मागणी करतात. आज पिण्याच्या पाण्याचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असल्याने पाणीयोजना पूर्णत्वाला जाईल, यासाठी राज्य सरकारने १३ कोटी व विशेष बाब म्हणून १३ कोटी असा २६ कोटींचा निधी निश्चित दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्ह्य़ातील विविध कामांच्या अखíचत निधीवर पवार यांनी, गेल्या ३ वर्षांपासून बॅडमिंटन हॉलचा निधी खर्च झाला नाही. हा काय प्रकार आहे, असा सवाल करून जिल्हा प्रशासनाला चांगलेच फटकारले व वेळेत निधी खर्च करा, अशी ताकीद दिली. औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राला ‘अ’, तर नर्सी नामदेवला ‘ब’ दर्जा मिळावा, अशी मागणी आहे. औंढा तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा, ही आपली इच्छा असल्याचे सांगून शेगावच्या गजाननमहाराज देवस्थानच्या धर्तीवर येथील विकास व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नर्सी नामदेव तीर्थक्षेत्राच्या विकासासाठीही प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
आमदार दांडेगावकर यांच्यामुळे वसमत तालुक्यात अनेक सहकारी संस्था यशस्वीरीत्या कार्यरत असल्याचे प्रशस्तिपत्र पवार यांनी दिले. तसेच सूर्यकांता पाटील यांच्या पराभवाबद्दल खंत व्यक्त केली. विकासासाठी निधी ओढून आणणाऱ्यांचा पराभव होतो, ही बाब येथे पाहावयास मिळाल्याचे सांगून ती खेदाची असल्याचे ते म्हणाले. जातीय शक्तींना दूर ठेवण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार राज्यात काम करीत आहे. मात्र, काही पुढारी खोटे पण रेटून, बेताल आरोप करीत जनतेची दिशाभूल करीत आहेत. पण त्यांना त्यांची जागा दाखवा, असा टोलाही त्यांनी लगावला.