-डॉ. स्मिता प्रकाश जोशी

“काय मग मालती आणि सुहास काय म्हणतेय तुमचं सेकंड इनिंग?”
“शोभना, अगं कसली सेकंड इनिंग आणि कसलं काय? आम्हा दोघांना यापूर्वी एकमेकांशी बोलायला वेळ काढायला लागायचा आणि आता दोघंही सोबत आहोत, तरी एकमेकांशी बोलणंच होत नाही आणि काही बोलायचं म्हटलं, की तुझी मैत्रीण माझ्याशी वाद घालत राहाते, कुठं ट्रीपला जाण्याचं ठरवलं तरी ‘आपण दोघचं काय जायचंय?’ असं म्हणून माझ्यासोबत येणं टाळते. मी काहीही सांगायला गेलं तर माझ्यावर चिडचिड करते, तूच काहीतरी समजावून सांग तिला.”

सुहास आपल्या पत्नीची तक्रार शोभनाकडं करत होते, हे सगळं ऐकून मालती आणखीनच चिडली, “करा, तुम्ही माझ्या तक्रारीच करा. आयुष्यभर मी सर्व सांभाळलं, घर आणि माझी नोकरी सांभाळून दोन मुलांना वाढवलं. त्यांचा तुम्ही कधीही अभ्यास घेतला नाहीत, की मुलांच्या इतर उपक्रमांकडं लक्ष दिलं नाहीत. जेव्हा तुमचा वेळ हवा होता, मुलांना घेऊन ट्रिपला जाऊ या असं वाटतं होतं, तेव्हा तुम्हांला आमच्यासाठी सुट्टी मिळाली नाही आणि आता त्याचं काहीही अप्रूप राहिलेलं नाही, आता कुठं फिरत बसायचं? तेव्हा घरात थोडं तरी लक्ष द्या म्हटलं तर ‘घरगुती गोष्टी माझ्यापर्यंत आणू नकोस, तुझे तू निर्णय घ्यायला शीक,’ असं तुम्हीच मला म्हणत होतात, आता घरातील प्रत्येक गोष्टीत तुम्ही लक्ष घालताय,‘हे असंच का?’ ‘ते तसंच का?’ असं सारखं विचारत बसता, त्यामुळं तुम्ही प्रत्येक गोष्टीत लुडबुड करताय असं मला वाटतंय, तुमची घरात अडचणच वाटू लागते.”

आणखी वाचा-समझोत्याने बलात्काराचा गुन्हा रद्द करता येणार नाही…

“म्हणजे काय? माझ्याच घरात आता माझी अडचण होतीय?” सुहासचा सुरही आता चढला होता पण तरीही, आज मनात काय आहे, ते सगळं बोलूनच टाकायचं असं मालतीनं ठरवलं.
“शोभना, अगं निवृत्तीनंतर मी किचन मधील कोणत्या गोष्टी कुठं ठेवायच्या? किराणा मालाची यादी कशी करायची?कपाटामध्ये मी कपडे कसे ठेवायचे? घरातील मॅनेजमेंट कशी करायची? यावर मला लेक्चर देणं सुरू होतं. त्यांना वाटतं, जसं काही मी त्यांच्या ऑफिसमधील एक कर्मचारी आहे. तूच सांग मी एवढे दिवस मी एकटीनं सर्व बघते आहे,आणि वेळेचं नियोजन मला जमत नाही का? सुहास उगाचंच रिटायर्ड झाले असं मला वाटू लागलं आहे.”
“मालती, इतके दिवस मी घरात लक्ष घालत नव्हतो, म्हणून तू चिडचिड करायचीस आणि आता लक्ष घालतोय म्हणूनही चिडचिड करतेस, तुला नक्की काय हवंय ते मला कळतंच नाही.”
“मला काय हवंय हे तुम्हाला कळलं असतं तर, किती बरं झालं असतं. मला कधी कधी वाटतं त्या ‘अग्गोबाई अरेच्चा’ सिनेमामधील नायकाला जशी स्त्रियांच्या मनात काय चाललंय ते ओळखण्याची शक्ती मिळते तशी सर्व पुरुषांना मिळायला हवी, तरंच स्त्रीचं मन पुरुषाला कळेल.”

आणखी वाचा-सौदी अरेबियातील जागतिक संरक्षण प्रदर्शनात भारतातील या तीन महिला अधिकाऱ्यांनी केलं प्रतिनिधित्व

शोभना दोघांमधील संवाद ऐकत होती, त्यांचे बोलणे,उत्तर-प्रत्युत्तर चालूच होते, शेवटी तिनं दोघांनाही थांबवलं आणि म्हणाली, “कशासाठी वाद घालताय? खरं तर तुम्ही दोघंही आपापल्या जागी बरोबर आहात. सुहास, लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात, मालतीला तुमची साथ प्रत्येक कामात हवी होती. तुमचा सतत सहवास हवा होता, पण नेमकं त्याच वेळेस तुमचं करिअर, इतर जबाबदाऱ्यांमधून बायकोला आणि मुलांना तुम्हांला वेळ देता येत नव्हता, हे सर्व मालतीनं स्वीकारलं, सवयीचं करून घेतलं आणि आता जेव्हा तुम्ही सर्व गोष्टीत लक्ष घालू पाहताय तर तिला ते जड जातंय, आणि मालती निवृत्तीनंतर सुहासनं आता कुटुंबियांना पूर्ण वेळ द्यायचा, घरासाठी तुझ्यासाठी जे करता आलं नाही ते करायचं असं ठरवलं आहे, पण तुला त्यांची ती लुडबुड वाटते. पण हीच खरी वेळ आहे, दोघांनीही एकमेकांना समजावून घेण्याची. ज्या गोष्टी यापूर्वी करता आल्या नाहीत त्या आता करता येतील. पण एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यात, निर्णयात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं लग्न आता प्रौढ झालं आहे. आपल्या जोडीदाराला नक्की काय आवडतं?कोणत्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो? आणि कोणत्या गोष्टींमुळे ठिणगी पडते? याची माहिती तुम्हांला नक्कीच आहे, मग त्याचाच उपयोग करून आनंदानं एकमेकांच्या सहवासात सेकंड इनिंगचा अनुभव घ्या.”

शोभनाशी बोलताना आपलं नक्की कुठं चुकतंय याचा अंदाज दोघांनाही आला. एकमेकांशी न बोलताही दोघांनी हे समजलंय आणि त्यांनी काहीतरी ठरवलंय हे शोभनाच्याही लक्षात आलं. ती समाधानानं घरी परतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smita joshi606@gmail.com)