तन्मयी तुळशीदास बेहेरे

यारो दोस्ती… बडी ही हसीन है… ये ना हो तो… क्या फिर… बोलो ये जिंदगी है… ‘फ्रेंडशिप डे’ ला हे गाणं आपल्या जानी दोस्तांसोबत गाताना केवढं ग्रॅण्ड वाटतं ना! आठवतं? कॉलेज सुरु झाल्या झाल्या पहिल्याच आठवड्यात फ्रेंडशिप डे साजरा केला जायचा. त्याकाळात शाळेत असताना मैत्रीला हे फ्रेंडशिपच वलय नव्हतं पण कॉलेज मध्ये आल्या आल्या मैत्री सेलिब्रेट करण्यासाठी हा हक्काचा सण मिळाला. हातावर रंगीबेरंगी रिबीन्स बांधून हातावरच काय पण गालावरही मित्राचं नाव लिहून घेऊन मिरवण्यात कॉलेज तरुण तरुणी कसल्या बेफाम होतात, त्या व्हॅलेंटाईन पेक्षा हा फ्रेंडशिप डे चिक्कार जवळचा होता, आहे आणि राहीलही… आता लिहिताना मलाही माझे शाळा- कॉलेजचे दिवस आठवले… इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये असताना ‘भावस्पंदन’ नावाचा मराठी कार्यक्रम असायचा तेव्हा जुळलेली मैत्री, कार्यक्रमाच्या तालमी, एकमेकांना साथ देणं आणि नको तेवढी भांडण सुद्धा झाली.. पण त्या मित्र मैत्रिणींना आजही भेटायला केवढ भारी वाटतं!

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
PM Narendra Modi Singing Kisi Ke Muskarahto Me
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..
Asked not to ride a motorcycle after suffering a brain stroke, Kolkata man’s cycle now gets all the attention
ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video
big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल

ही शाळा- कॉलेजमध्ये जुळलेली कोवळ्या वयातली दोस्ती, नोकरी लागल्यावर लग्न झाल्यावर पण फक्त आठवणींनीही निभावली जाते. म्हणून कधीतरी ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी कुठला ही कॅफे गाठला जातो तर कधी वेळात वेळ काढून थंड हवेच्या ठिकाणी वीकेण्डला गेटटुगेदर केले जातं…

आणखी वाचा : घर आणि करिअर : कधी दोन पावलं पुढे कधी दोन पावलं मागे

मैत्री… या हृदयीचे त्या हृदयी कळे अशी मैत्री… बघाना जगात हे एकच नातं असं आहे की जे आपण स्वतः निवडतो. बहुतांशी आपल्याही नकळतच… आपल्या डब्यातला खाऊ खाणारी, स्कूलबसमध्ये आपल्या सोबत बसणारी, आपल्याच बाकावर बसणारी, आपल्या मागे पुढे रोल नंबर असणारी, ट्रेकला सहज आपल्या सोबत चालायला लागणारी, एकाच ट्रेनला चढणारी, नाटकाच्या तालमीला रोज भेटणारी अशी कोणतीही व्यक्ती आपली मित्र मैत्रीण होते. खूप वर्षाची मैत्री झाल्यानंतर जर तुम्ही विचार केलात की तुमची पहिली भेट कुठे झाली होती तर ही अशीच काहीशी उत्तरे सर्वांना मिळतात. स्वभाव पाहून, गुण जुळवून, तोलून मापून तर लग्न जमतात; मैत्री मात्र सहज होते. त्यासाठी वयाच, जातीचं, सामाजिक स्तराचं कसलंही बंधन नाही, एकच महत्वाचं ‘आपुलकी आणि जीवाला जीव देणं’ बास.

पण मग एवढं सगळं छान असताना कधी बरं एक्सपायरी येते मैत्रीला? नोकरी, लग्नानंतर परगावी गेलेल्या मित्र- मैत्रिणींबद्दल बोलत नाही बरं का… तर गैरसमजातून लांबलेल्या किंवा अगदी तुटलेल्या मैत्री विषयी बोलते आहे. मुळात मैत्रीण हीच एक हक्काची जागा असते, जिथे आपापल्या मनातलं खोल सलत असलेलं सांगता येत. मनसोक्त रडता येतं. राग काढता येतो पण हीच जागा काही गैरसमजामुळे आपण कायमची गमावून बसलो तर? अबोल्यात वर्ष निघून जातात पण तो मित्र वा ती मैत्रीण काही परत येत नाही मग त्या मैत्रीला एक्सपायरी आली असं समजायचं का? ह्म्म…

तसं बघायला गेलं तर रक्ताची वा औपचारिक नाती म्हणजे आई, बाबा, बहीण, भाऊ, आजी, आजोबा, नवरा, बायको, मावशी, काका, आत्या, भाचे, पुतणे, जावई, सुना यातील काही जन्मापासून मिळालेली असतात तर काही नंतर निर्माण होतात पण तरीही त्यांच्यात ही एक्सपायरी शक्यच नसते कारण ती निभावणं हे आपलं कर्तव्यच असतं आणि ती नाती कधी कुरकुरत तर कधी आनंदाने आपण मान्यही केलेलं असतं, या नात्यांमध्ये कुठे वितुष्ट आले तरी त्याची कुटुंबात, समाजात चर्चा होणं कोणत्याही शहाण्या माणसाला नको असतं. म्हणूनच सणवार ,कौटुंबिक समारंभात सगळे एकत्र येतात. ‘आमचं बाई किती छान चाललंय’ हे दाखवण्याकडेच त्यांचा कल असतो. उदाहरणच द्यायच झालं तर कोकणातील गणेशोत्सवाचं घेता येईल. गणपतीच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात आणि गणेशोत्सव एकत्र खेळीमेळीने साजरा करतात. दरवर्षी एकत्र येण्याने वितुष्ट कधी मिटलं जातं हे कित्येकवेळी लक्षातही येत नाही.

आणखी वाचा : कुकरमध्ये अन्न शिजवा… शिट्ट्या न करता!

पण मैत्रीच मात्र तसं नसतं, ना असे एकत्र यायला कुठल्याही समारंभचं बंधन नसतं ज्या निमित्ताने मनातील गैरसमज वा किल्मिषे दूर करण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळेल. आपली मैत्री का तुटली वा संपली? या प्रश्नाचं उत्तर द्यायला कोणीही बांधील नसतं. बर या दोन मित्रांचं बिनसलं म्हणून समाजाला किंवा कोणाला काहीही फरक पडणार नसतो.

मुळात एवढया वर्षांची मैत्री पुन्हा का जोडावीशी वाटत नाही? तशी बरीच कारणं आहेत म्हणा म्हणजे वेगळे पर्याय उपलब्ध झाले म्हणून की अगदी ‘ग’ ची बाधा झाली म्हणून? किंवा अगदी काहीतरी लपवाछपवी करायची असेल म्हणून, की निव्वळ स्पर्धा वाटते म्हणून? काहीही असलं तरी झालेले गैरसमज दूर झालेच पाहिजेत आणि ते चर्चा करूनच दूर करता येतात आणि गैरसमज चर्चेने दूर होणार नसतील तर ती मैत्री कसली? आयुष्य आहे हे, यात दोन माणसांचा संबंध आला तिथे मतभेद होणारच पण मैत्रीत ते लवकर सुटले पाहिजेत. एकाने जरा पडतं घेतलं तर दुसऱ्यानं तशी त्याला संधी द्यायला हवी. इतकं हलकं फुलकं नातं असत मैत्रीत.

पण काही वेळा मैत्रीभंगाच दुःख हे प्रेमभंगाएवढच दाहक असतं. त्यातल्या त्यात जे भावनाप्रधान हळवे असतात ते तर पुरते कोलमडून गेलेले ही मी पाहिले आहेत. माझ्या वर्गात एक अशीच जोडगोळी होती. केतकी आणि जान्हवी, दिसायला पण जणू जुळ्या बहिणीच, त्यांच सगळंच एकत्र व्हायचं, अभ्यासापासून पुढे नोकरीसुद्धा एकत्र, लग्न एकाच वेळी झालं, बाळही जवळपास एकाच वेळी झाली इतका अगम्य योगायोग… पण हल्लीच झालेल्या शाळेच्या गेट टूगेदर मध्ये मात्र त्या दोघी एकमेकांचं तोंडही पाहत नव्हत्या. कारण काय होतं ते काही तेव्हा कळू शकलं नाही पण त्यातल्या त्यात जान्हवी जरा हळवी होती, ती डिस्टर्ब वाटली तिच्यासमोर कित्येक प्रश्न आणि फक्त प्रश्नच आणि उत्तरं मात्र फक्त केतकीकडे होती पण तीही पुढे यायला तयार झाली नाही. संवेदनाहीन जगणं हे कदाचित मैत्री तुटण्याचं कारण असू शकेल का?

असो, इंटरनेटच्या सध्याच्या काळात आपण आभासी जगात असतो. वेबसिरीज पाहतो, अनोळखी लोकांशी ऑनलाइन गप्पा मारतो तेव्हा सगळंच छान छान असतं कोणी वाईट बोलत नाही, आपले दोष दाखवत नाही म्हणून ही सर्वजण जवळची होतात. पण मग आता हक्काची मैत्री टिकली काय नि तुटली काय काहीच फरक पडत नाही का? या आभासी जगात किती दिवस जगणार? कधीतरी आपली, स्वतःची, हक्काची, हाडामासाची माणसं जवळ असावी असं तर वाटणारच, त्यांना काय वाटत हे जाणून घ्यावंस वाटणारच, मनातला सांगावंस वाटणारच!

आणखी वाचा : पीसीओडी आनुवंशिक आहे का?

ज्या माणसाला पुढे जायचं असतं, सुसंस्कृत आणि आनंदी आयुष्य जगायचं असतं त्याने मैत्रीचा हात कधीही झिडकारू नये. कारण मैत्रीच आयुष्य सुंदर बनवते, जगण्याचा उत्साह देते, आयुष्यभराची उमेद देते. आपल्या चांगल्या वाईट- प्रसंगाची साक्षीदार होते. कधी खचून गेलो तर पाठीवर थाप मारून उठवते सुद्धा… मुख्य म्हणजे आयुष्याच्या प्रवासात नेहमीच सोबत चालते…

पुढे कोणास ठाऊक पण येणाऱ्या आयुष्याच्या उत्तरायणात मागे वळून पहिलं तर हेच मैत्रीचे दिवस तुम्हाला आठवतील… कदाचित पावसात एकत्र भिजल्याचे, एकत्र अभ्यास केल्याचे, शिक्षकांची खोड काढल्याचे, कट्ट्यावर मांड ठोकून गप्पा मारल्याचे, सोबत ट्रेकला गेल्याचे, एक कटिंग दोघात शेअर करण्याचे… हे क्षण शाश्वत आनंद देणारे असतात आणि ते आपल्या आयुष्यात आणलेली आपली लाडकी मैत्रीण वा लाडका मित्र… त्यांना अंतर देऊन कसं चालेल? जमलं तर ही मैत्रीतील एक्सपायरी टाळा!

tanmyibehere@gmail.com