अभिनेत्री काजोल

मी जशी घडले त्यामागे माझी आई अभिनेत्री तनुजा, माझी आजी शोभना समर्थ यांची मूल्यं, या दोघींचे पालनपोषण होते. माझी जडणघडण, माझी विचारसरणी यावर आई आणि आजी यांचा प्रभाव असूनही माझे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडले, याचं श्रेयदेखील या दोघींचं. आजी-शोभना समर्थ, आई तनुजा आणि आजीची आई रतनबाई शिलोत्री या सगळ्या कर्तृत्ववान, स्वतंत्र बाण्याच्या, स्वावलंबी, खंबीर स्त्रिया, आजच्या भाषेत सांगायचं झाल्यास ‘करिअरस्टिक वूमन’. मी लहान असताना आजी, आईला नेहमीच काम करताना पाहिलंय, आईने रुपेरी पडद्यावर प्रथम काम केलं तेव्हा तिचं वय फक्त ७ होतं. आई गेली ७३ वर्षं सतत काम करतेय! माझ्यावर त्यांचा प्रभाव न पडल्यास नवल होतं. अभिनय हा रक्तात भिनलेला व्यवसाय असल्यानं मी अभिनयाकडे आकृष्ट झाले हे स्वाभाविकच होतं त्यामुळे आईने मला उच्च शिक्षणासाठी विदेशात पाठवलं तरी मी अभिनयाच्या ओढीने भारतात परतले. विवाहानंतर, विशेषतः मातृत्वानंतर मी करिअरमधून ‘ब्रेक’घेतला. अभिनय करणं ही कधीही आर्थिक निकड नव्हती. अभिनय ही मानसिक गरज असते सच्च्या कलावंताची. जी माझी आहे. अनेकांची असेल.

आणखी वाचा : कोविडच्या ताणामुळे स्त्रियांच्या मासिक पाळीवर परिणाम

माझी लेक निसया हिच्या जन्मानंतर निसयाची पूर्ण जबाबदारी आई (तनुजा ) आणि अजयच्या आई (वीणा देवगण) यांनी घेण्याची पूर्ण तयारी दाखवली. मी कसलीही चिंता न करता शूटिंगला जावं, असं मला या सगळ्यांनी सांगितलं, शिवाय अजयच्या बहिणी नीलम, कविता यांनीदेखील या निर्णयाची पाठराखण केली. अजयला मी लग्नानंतर, मातृत्वानंतर करिअर सुरू करू का नको हे कधी विचारलं नाही, एक तर त्यानं कधीच मला कुठल्याही बाबतीत विरोध केला नाही, माझे प्रत्येक निर्णय स्वतःचे होते, त्यामुळे सगळ्यांनी मला जरी करिअर पुन्हा (मातृत्वानंतर ) सुरू करावं असा सल्ला दिला तरी मी ब्रेक घ्यायचा ठरवला, हा सर्वस्वी माझा स्वतःचा निर्णय होता. आपल्या अपत्याचे संगोपन करण्यास पूर्ण वेळ मिळावा, त्यात इतर कामाचे ताण-तणाव, संवादाचे पाठांतर, रिहर्सल्स, शूटिंगच्या अनियमित वेळा अशी कुठलीही बंधनं माझ्यावर नको होती. पूर्ण वेळ मुलांना द्यावा, मातृत्व एन्जॉय करावं म्हणून मी निसया आणि युग (मुलगा) या दोघांच्या जन्मानंतर ‘ब्रेक’ घेतले. माझ्या अपत्य संगोपनाबाबत लहान-मोठी चूकदेखील माझ्या अपरोक्ष घडू नये, असं मला वाटत होतं. अन्यथा मी स्वतःला कधी माफ करू शकले नसते. लहान मुलांचे संगोपन ही जबाबदारी असते. त्याचमुळे मी त्या काळात करिअरवर आनंदानं पाणी सोडलं!

आणखी वाचा : आहारवेद : मासिक पाळीतील अतिरक्तस्रावावर उपयुक्त आवळा

आपली फिल्म इंडस्ट्री हिरोप्रधान आहे, बेभरवशाची आहे, स्पर्धा आहे, ‘हाजीर तो वजीर’ या न्यायानं इथे काम मिळतं, विवाहित आणि आई झालेल्या अभिनेत्रींना कोण ‘कन्सिडर’ करणार? एक ना दोन अनेक प्रश्न अनेकांनी माझ्याभोवती उभे केले, पण मला माझ्या मातृत्वापुढे अन्य कुठल्याही प्रश्नांना महत्त्व द्यावंसं वाटलं नाही. इट नेव्हर मॅटर्ड टु मी, व्हेदर आय कॅन गेट वर्क ऑर माइट नॉट! आई, आजी, पणजी, मावशी (नूतन ) वर्किंग मदर होत्या, त्यांचा आदर्श माझ्यासमोर असून मला जो निर्णय योग्य वाटला तोच मी घेतला. निसयाचा जन्म २० एप्रिल २००३ तर युगचा जन्म १३ एप्रिल २०१० चा. निसयाच्या जन्मानंतर २००६ मध्ये माझा ‘फना’ चित्रपट रिलीज झाला. युगचा जन्म झाल्यांनतर जो ब्रेक मी घेतला, त्य नंतर ‘दिलवाले’ -हा २०१५ मध्ये रिलीज झाला. ‘त्रिभंगा’, ‘व्हीआयपी’, ‘हेलिकॉप्टर इला’, ‘तानाजी’ अशा फिल्म्स मिळत गेल्यात. आणि मी २ – कधी ३ वर्षांचा ब्रेक घेऊनही काम करत राहिले. काम करण्याचा संबंध ‘रिलेव्हंट’ राहण्याशी लावला जातो. त्यामुळे करिअरला ३० वर्षं झाल्यांनंतरही मी अभिनयात सक्रिय राहू शकले, ‘रिलेव्हंट’ राहू शकले. अनेक निर्माते -दिग्दर्शक यांनी मला कणखर भूमिका दिल्यात, माझा विचार केला त्या अर्थी त्यांना ही मी ‘रिलेव्हंट’ वाटत असावी.
खरं तर लेकीच्या जन्मानंतर मी धास्तावलेले होते. आईच्या मनात आपल्या बाळाविषयी, त्याच्या सुरक्षतेविषयी नेहमी एक प्रकारची चिंता असते. बाळाचे आरंभीचे १२ महिने कठीण असतात. बाळ रात्रभर रडतं, वेळी-अवेळी झोपतं, कधी बाळाला उलट्या होतात, त्याचं वाढणारं बाळसं आईची झोप उडवतं. मातृत्वाचा आनंद म्हणायला ठीक आहे, पण मी निसयाच्या वेळी खरंच घाबरलेली होते. तिचा पहिला वाढदिवस कसा साजरा करायचा, असं, अजय, आई, कुटुंबानं मला विचारलं, पण मी तिचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट केला नाही. एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन आलो, किरकोळ वस्तू घेतल्या आणि घरी आलो. तिला कळायला लागलं आणि मग वाढदिवस थाटात सुरू झाले.

आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : मन चिंता करू लागलं तर?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझ्या प्रत्यक्ष जीवनात आणि करिअरमध्येही मातृत्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझ्या मुलांच्या आरंभिक काळात मी त्यांच्यासोबत असणं मला गरजेचं वाटलं, तेच फिल्मच्या चॉइसबाबत घडलं. ‘हेलिकॉप्टर इला’नंतर नुकताच रिलीज झालेला ‘सलाम व्हेंकी’ हे चित्रपट आई आणि तिचे अपत्य आणि त्या अनुषंगाने येणारे प्रश्न यावर आधारित होते, या कथेशी मी आई म्हणून रिलेट झाले. अर्थात माझी मुलं कथेतल्या समस्यांशी निगडित नाहीत,
मेरे बच्चे दुनिया के बेस्ट बच्चे और मैं हूँ उनकी बेस्ट मॉम!
पेरेंटिंग टिप्स –
– मी जगातील आदर्श आई आहे, असं मला मुळीच वाटत नाही, त्यामुळे पालकत्वाच्या माझ्या अशा कुठल्याही खास संकल्पना नाहीत. तरीही मी म्हणेन मुलांना वाढवताना त्यांना धाकात न ठेवता पालकांचा आदर वाटला पाहिजे, असं वागणं गरजेचं आहे. तसेच ज्या गोष्टी त्यांच्यासाठी हितकारक नाहीत, ज्यामुळे त्यांच्या भविष्यावर दुष्परिणाम होऊ शकतो, अशा गोष्टींपासून परावृत्त करणं, शक्य तेवढ्या गोडीगुलाबीनं त्यांना रोखणं हे पालकांच्या हाती आहे. धाकदपटशा मुलांवर सकारात्मक परिणाम घडवत नाही, असं मला वाटतं.
* मुलांचं जरी चुकले, किंवा त्यांचं वागणं अयोग्य आहे असं जरी वाटलं तरी त्यांना घरी आलेल्या पाहुण्यांसमोर रागावू नये. परक्यांसमोर आई /वडिलांनी आपला अपमान केला अशी मुलांची भावना होता कामा नये. त्यामुळे मुलांना शक्यतो एकांतात उपदेश किंवा त्यांचे कुठे चुकले हे सांगावं. samant.pooja@gmail.com