आराधना जोशी

सन २०२० मध्ये युनिसेफचा जगभरातील बालकांची, त्यांच्या अन्न आणि पोषणाची गेल्या २० वर्षांतील स्थिती दर्शवणारा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात कुपोषण ही भारताची मुख्य समस्या असून आजही ५०% मुलं कुपोषणाच्या कोणत्या ना कोणत्या तरी समस्येला सामोर जात असल्याचे नमूद करण्यात आले होते. एकीकडे हा अहवाल तर दुसरीकडे डब्ल्यूएचओच्या सर्वेक्षणानुसार तब्बल दीड कोटी भारतीय मुले स्थुलत्वाच्या विळख्यात अडकली आहेत. चीननंतर सर्वाधिक स्थूल मुले ही भारतात आहेत. याचाच अर्थ, भविष्यात ज्यांच्या आधारावर आपण महाशक्ती होण्याची स्वप्न पाहत आहोत, त्यापैकी निम्मी पिढी ही कुपोषित आहे तर उरलेल्यांपैकी बहुसंख्य मुलं ही स्थूलत्वाकडे जाणारी आहेत. म्हणजे, समाजातल्या एका घटकाला भाकरी ही चंद्राप्रमाणे आहे, जी सहजसाध्य नाही; तर जिथे ही सहजसाध्य आहे, त्या घटकांनी तिच्याकडे पाठ फिरवून आरोग्याला हानीकारक खाण्यावर भर दिला आहे.

सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे काय?

स्थुलत्वामुळे लहान वयातच मुलांमध्ये उच्च रक्तदाब, हृदयरोग, टाईप टू डायबेटिस, दमा, नैराश्य असे अनेक आजार दिसायला लागले आहेत आणि त्यांचे प्रमाणही वाढत आहे. हाय कॅलरीज असणाऱ्या पदार्थांचे वाढलेले सेवन तसेच मुलांचा वाढलेला स्क्रीन टाइम स्थूलत्वाला कारणीभूत आहेत. याशिवाय अलीकडे मुलांना भूक नसताना बळजबरी खाऊ घालण्याची चुकीची पद्धत रूढ झाली आहे. टीव्हीसमोर बसून मुले खात राहतात किंवा त्यांना खाऊ घातले जाते. त्यामुळे मूल नेमके किती खात आहे, याचे भान ना मुलांना राहते ना पालकांना. त्याशिवाय ५ ते १५ वर्ष वयोगटामध्ये मोठ्यांसारखी ‘सिडेंटरी लाईफस्टाईल’ म्हणजे एकाच जागी बसून राहण्याची जीवनशैली मुलांमध्ये दिसून येत आहे. आणि यात ग्रामीण मुलेही मागे राहिलेली नाहीत. कोरोनानंतर तर या जीवनशैलीत झपाट्याने वाढ बघायला मिळाली आहे.

हेही वाचा >> भावंडांबद्दल वाटणारा मत्सर कसा कमी कराल? ‘या’ छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसेल सकारात्मक बदल

आऊटिंग आणि टेस्ट्स बड्सचा लहान मुलांवर काय परिणाम होतो?

‘ऑनलाईन ऑर्डर’द्वारे खाद्यपदार्थ मागवणे ही शहरांमध्ये जवळपास रोजचीच गोष्ट झाली आहे. ‘आऊटिंग’चे प्रमाण वाढले आहे. शिवाय प्रत्येक शनिवार-रविवारी बाहेर जाऊन खाण्याची पद्धत रूढ झाली आहे. या सगळ्यामुळे बाहेरचे खाण्यास मुले सरावली आहेत. अनेकदा तर बाहेरचे खाल्ले नाही तर अनेक मुले बेचैन होतात, पालकांकडे हट्ट करतात आणि पालकही त्यांचे हट्ट पुरवतात. मात्र या सगळ्याचा शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेतला जात नाही. जवळपास रोजच मसालेदार, चमचमीत, रंगांचा वापर केलेले पदार्थ खाल्ल्यामुळे सगळ्यात पहिला परिणाम आपला टेस्ट बड्सवर होतो. त्यामुळे हळूहळू जीभेवरच्या या टेस्ट बड्सना घरचे साधे गरमागरम जेवणाची चवच कळेनाशी होते आणि मग घरच्या जेवणाला नाके मुरडली जातात. घरचे जेवण असेल तर मुले जेवेनाशी होतात आणि मग बाहेरचे पदार्थ खातात तर ते तरी पोटभर खाऊ दे असा विचार करून पालकही त्याला नकळत प्रोत्साहन देतात. कधीतरी बाहेरचे खाणे वेगळे आणि नेहमी खाणे वेगळे, यातला फरक पालकांनी लक्षात घेतला पाहिजे.

घरात स्क्रीन फ्री झोन हवा

म्हणूनच सर्वांत महत्वाची व निर्णायक भूमिका ही पालकांची ठरू शकते. तान्हा बाळांना जर योग्य प्रकारे आणि किमान सहा महिने स्तनपान मिळाले तर अशा मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण फार कमी बघायला मिळते. याशिवाय जरा मोठ्या मुलांमधील स्थूलतेसाठी पालकांना आपल्या मुलांमध्ये जो काही बदल घडवून आणायचा आहे तो आधी त्यांनी स्वत:मध्ये घडवून आणला पाहिजे. पालकांना स्वत:चा ‘स्क्रीन टाईम’ आधी कमी करावा लागेल, टीव्हीसमोर बसून जेवणे बंद करावे लागेल, बाहेरचे खाणे कमी करुन साधे, रुचकर पदार्थ घरी तयार करण्यावर भर द्यावा लागेल. घरातील सर्वांनी एकत्र जेवले पाहिजे. त्यावेळी ‘स्क्रीन फ्री झोन’ची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. 

हेही वाचा >> बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

याशिवाय आहाराचे नियोजन, त्यातल्या घटकांचे वर्गीकरण, त्यातली पोषणमूल्ये यांचा थोडाफार अभ्यास पालकांचा असलाच पाहिजे. आपल्या आहाराचा पंचमांश भाग हा फळे-भाजीपाला, सॅलड यांचा असावा. निदान चार ग्लास पाणी दिवसातून प्यावे. सकाळी चहा कॉफी ऐवजी ग्लासभर दूध, दुपारच्या जेवणात दही, ताक किंवा पनीर यांचा समावेश करणे आणि रात्री झोपायच्या आधी परत एक ग्लास दूध पिणे अशा प्रकारे किमान तीनवेळा डेअरी पदार्थांचे सेवन करावे. ताटात किंवा हल्ली डिशमध्ये येणारा पदार्थ हा दिसायला आकर्षक असला पाहिजे. तरच तो खाण्याची शक्यता वाढते. म्हणूनच विविध रंगाच्या भाज्यांचा वापर करून प्लेट सजवली गेली तर मुलेही आनंदाने तो पदार्थ खायला तयार होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय मुख्य बदल म्हणजे स्क्रीन टाईमवर मर्यादा आणली गेली पाहिजे. त्याऐवजी एक तास खेळ किंवा व्यायाम हवा. हल्ली खेळाचे गणित स्पर्धेपुरते मर्यादित राहिले आहे. त्यामुळे कमी संख्येने मुले खेळांमध्ये सहभागी होतात. उर्वरित मुलांच्या पायाला अनेक दिवस मातीच लागत नाही. शाळा आणि क्लास या चक्रात मुलांची पावले मैदानी खेळांकडे वळतच नाही. हे चित्र कुठेतरी बदलावे यासाठी पालकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. जंक फूडचा कमीत कमी वापर आणि आठ तास झोप जर मुलांना मिळाली तर स्थूलत्वाचे प्रमाण बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकते. आपले मूल गुटगुटीत आहे म्हणजे ते खात्यापित्या घरातील आहे असे समर्थन मुळात पालकांनीच करू नये. त्याऐवजी मूल सुदृढ कसे होईल याकडे अधिक लक्ष देणे आणि पालक म्हणून त्यासाठी आपले योगदान देणे ही सध्याची टॉप प्रायॉरिटी बनली आहे एवढे नक्की….