Women’s in Independent India आपला देश ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या उंबरठ्यावर आहे. नेहमी प्रमाणे हा दिवस या वर्षीही जल्लोषात साजरा करण्यात येईलच, किंबहुना केलाही पाहिजे. ज्या देशानी पारतंत्र्याचे विष चाखले आहे, स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे, अशा देशाशिवाय इतर कुणाला या स्वातंत्र्याचे मोल अधिक कळणार? परंतु, या देशाला मिळालेले हे स्वातंत्र्य या देशातील प्रत्येक घटक अनुभवत वा उपभोगत आहे का?

गेल्या काही महिन्यांपासून घडणाऱ्या घटनांनी भारतातील स्त्री खरंच स्वतंत्र आहे का, हा प्रश्न आज अधिक गहिरा होत चालला आहे? सध्या सुरू असलेले २०२३ हे वर्ष तर अनेक अर्थांनी हादरवून टाकणारे आहे. मे महिन्यापासून मणिपूरमध्ये धुमसत असलेल्या मतैइ विरुद्ध कुकी या प्रकरणात, कुकी महिलांची विवस्त्र निघालेली धिंड मन सुन्न करणारी होती. ज्या क्षणी हे प्रकरण उघड झाले त्या वेळी भारताच्या कानाकोपऱ्यातून या प्रकरणाचा निषेध करणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणाच्या आणखी मुळाशी ठाव घेतल्यावर या विस्तवात मतैइ स्त्रियाही होरपळल्याचे चित्र समोर आले. विशेष म्हणजे काही कुकी महिलांनीच हे समोर येवून मान्य केले. एकूणात काय तर, स्त्री कुठलीही असो, युद्ध- द्वंद्व कोणतेही असो …यात भरडल्या जाणाऱ्या महिला या दोन्हीकडच्या असतात.

आणखी वाचा: विश्लेषण: मेलुहा ते इंडिया भारताच्या विविध नावांचा प्रवास कसा झाला?

मणिपूरमध्ये घडलेली घटना परतंत्र भारतात घडलेली नाही, जे काही घडलंय, घडतंय ते याच ७७ व्या स्वातंत्र दिनाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतभूमीत. एखादी असहाय्य स्त्री, मग ती कुठल्याही वयातली असो, काही प्रकरणात पाळण्यातल्या तान्हुलीला या नराधमांनी सोडलेले नाही, अशा वेळी एकच प्रश्न निर्माण होतो… खरंच ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या उंबरठ्यावर उभी असलेली भारतीय स्त्री खरंच स्वतंत्र आहे का?

भारत स्वतंत्र झाल्यापासून महिलांना देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्याची चर्चा आजतागायत मोठ्या उत्साहात होतेच आहे. मुलींना शिक्षण मिळावं, त्यांनी स्वतःच्या पायावर सक्षम उभं रहावं, कोणावरही अवलंबून न राहता आपले निर्णय घ्यावेत, आपली उपजिविका स्वबळावर करावी, असं नेहमीच सांगण्यात येतं. किंबहुना त्या पद्धतीने चित्र बदलतानाही दिसतं आहे आणि काही प्रमाणात बदलंही आहे. फरक एवढाच की, सुधारणा ही मुलींनी, महिलांनी करावी आणि त्याच्या झळाही त्यांनीच भोगाव्यात. याच वर्षी घडलेले दुसरे प्रकरण म्हणजे दर्शना पवार हिचे. यूपीएसीसीसारख्या कठीण परीक्षेत तिने मिळविलेल्या घवघवीत यशामुळे ती चर्चेत आली, आणि यानंतर काय? तिच्या कथित प्रियकराने तिच्या शरीराचे ओळखू ही न येणारे तुकडे करावेत? हेच का तिच्या हुशारीचे बक्षीस? सोशल मीडियावर तर असे अनेक आहेत जे ‘तिच्या डोक्यात हवा गेल्याचे’ दाखले देतील, तिला मिळालेल्या यशामुळे तिने आपल्या कथित प्रियकराला नकार दिला याचाच राग डोक्यात ठेवून त्याने तिचा बळी घेतला, असे सांगतात. विशेष म्हणजे, हा दाखला देवून अनेक जण ‘त्या’ने केलेल्या खुनाचे समर्थन देखील करताना आपण पाहिले. आता इथे प्रश्न असा आहे की ‘आपण मान्य केले की, दर्शनाच्या डोक्यात यशाची धुंदी होती, आणि आपले उज्वल भविष्य पाहून तिने त्याला नकार दिला’, …तो नकार आपल्या दृष्टीने चुकीचा किंवा बरोबर हा दूरचा प्रश्न. पण होकार किंवा नकार देण्याचा निर्णय- अधिकार हा सर्वस्वी दर्शनाचा होता. ते तिचे स्वातंत्र्य होते. मग त्या स्वातंत्र्याचा आदर हा प्रत्येकानेच करायला नको का?

आणखी वाचा: विश्लेषण: Cultural Genocide – एखाद्या संस्कृतीच्या इतिहासातील पाऊलखुणा पुसून टाकणं शक्य असतं का?

निषेध किंवा विरोध अनेक मार्गांनी करता येतो. नकार पचवण्याची क्षमता नसलेल्या व्यक्तीने तिलाच संपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तो कथित प्रियकर तिच्यासाठी खरंच योग्य होता का? या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष मात्र केले जाते. उलट ती कशी चुकीची, ‘बघा तिला कसा शिक्षणाचा- यशाचा माज आलाय’, ‘म्हणून मुलींना जास्त शिकवू नये’, ‘बाहेर कामासाठी पाठवू नये’ या सारख्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या आपण वाचल्या. मुलींना, महिलांना शिक्षण देवू नये, त्यांना माज येतो. पण तुम्ही तर शिकलेले आहात ना ? मग एक दर्शना गेली तर दुसरी आयुष्यात येईल, मग तिचा खून करताना आणि तिच्या खुन्याला उघड पाठीशी घालताना कुठे गेले होते स्वतंत्र भारतात स्त्रियांना देण्यात येणारे स्वातंत्र्य?

पण सध्या भारतात अनेकांना नव्याने भेडसावणारी समस्या म्हणजे लग्नाला मुलगी मिळत नाही. मुली शिकलेल्या, जास्त कमावणाऱ्या म्हणून नकार देतात. अशा मुलींच्या पालकांच्या अपेक्षाही जावयासंदर्भात अतिरिक्त असतात. त्यामुळे काही ठिकाणी मोर्चे निघत आहेत. मुली आणि त्यांच्या पालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. भारतात एक काळ असा होता मुलगी नको म्हणून तिची गर्भातच हत्या केली जात होती (आजही हे घडते आहे, पण प्रमाण कमी झाल्याचे चित्र किमान रंगवले जात आहे). मुलगी जन्माला आली म्हणजे वंश कसा वाढणार, त्यातच तिच्या लग्नाचा खर्च गेला बाजार हुंडा (तोही आता वेगळ्या नव्या मार्गांनी वसूल केला जातो, फक्त त्याला हुंडा म्हणत नाही इतकंच!) हुंडा नाही दिला तर एखाद्या सिलेंडरच्या स्फोटात, तर कधी तिचा अपघाती मृत्यू होईल याचा काही नेम नव्हता, त्यातही ती पळून गेली तर आणखीनच भलतं टेन्शन, तिच्या अब्रूच रक्षणही करा. असे एक ना अनेक प्रश्न त्यामुळे तिचा जन्मच नको अशी स्थिती होती. परंतु समाजप्रबोधनाने यात फार मोलाची भूमिका बजावली. ९० च्या दशकात परिस्थिती थोडी फार बदलताना दिसू लागली. बेटी बचाव, बेटी पढ़ाओ, मुलगी शिकली, प्रगती झाली आदी मोहिमांनी थोडा प्रभाव दाखवला खरा. अनेक पालकांनी एक किंवा दोन मुली असतील तर मुलगा नको म्हणून धाडसी निर्णयही घेतले. मुलींना शिकवले आपल्या पायावर उभे केले.

आणखी वाचा: विश्लेषण: मोढेरा, मोडी आणि मोदी! काय आहे मोदी नावाचा इतिहास?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता ज्यांच्या घरात मुलगा आणि मुलगी दोघेही आहेत, तिथेही मुलगी हुशार म्हणून तिला शिक्षणासाठी प्राधान्य दिले गेले. त्याच मुली आज मोठ्या झाल्या, काहींनी नावलौकिक मिळवलं. मुलींच्या यशात त्यांच्या पालकांचाही वाट मोठा आहे. मग त्याच मुलींसाठी पालकांनी, तोलामोलाचा राजकुमार मिळावा ही अपेक्षा बाळगली तर ते चूक ठरावं, हेच आश्चर्य ! लग्न म्हणजे तडजोड… असं गोंडस विधानकरून परत एकदा त्या मुलींनीच तडजोड करावी असा अस्पष्ट इशारा त्यांना आजही दिला जातो. प्रश्न असा की, त्या मुली शिकून आपण कर्तृत्त्व सिद्ध करू शकतात . तर त्यांच्याशी लग्न करू इच्छुक मुलं कुठे मागे पडतात? चला, त्यातल्या त्यात एखाद्या मुलीने धाडसी निर्णय घेतलाच तर तिने आपलं करिअर सांभाळून घरं परिपूर्ण सांभाळणं अपेक्षित असतं. काही ठिकाणी मोलकरीण नको, असेही फतवे काढले जातात, म्हणजे त्यांना ‘सुपरवूमन’च अपेक्षित असते. बाहेरही ९ तास काम करून घरात आल्यावर दावणीला बांधलेल्या बैलाप्रमाणे राबराब राबेल. त्यामुळे आजही आपल्या समाजात महिला स्वतंत्र आहेत का? हा प्रश्न अद्यापही उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत!