-स्वप्निल घंगाळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळाला डोलीमधून घेऊन जात असताना वेळीच रुग्णालयात न पोहोचल्याने बाळाचा मृत्यू किंवा गरोदर महिला रुग्णालयाच्या वाटेवर असतानाच वाहतुकीच्या साधनांअभावी वेळेत रुग्णालयात दाखल न करता आल्याने वाटेतच बाळाने अखेरचा श्वास घेतला… या बातम्यांचे मथळे वाचून या एखाद्या मागास देशातील वाटत असल्या तरी हे सारं फार दूर घडलेलं नाही. तर मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघरमधील या घटना आहेत आणि त्याही गेल्या काही आठवड्यांमधील. एकीकडे आपण देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा अमृत महोत्सव नुकताच साजरा केला. तर दुसरीकडे हे असं चित्र. आता या बातम्यांनी तेवढ्या पुरतं गलबलतं, कसं तरी होतं, आपण समाजासाठी काय करतोय असे विचार मनात येतात पण पुढे या विचारांच फारच क्वचित पद्धतीने कृतीत रुपांतर होतं. पुन्हा काही दिवसांनी असं काहीतरी घडलं आणि मग पुन्हा तेच ते अन् तेच ते…

खरं तर अशा बातम्या वाचल्यावर ‘इंडिया’ला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली आहेत असं वाटतं पण खेड्यात राहणारा ‘भारत’ मात्र स्वातंत्र्याच्या साडेसाताव्या म्हणजेच ७.५  व्या वर्षातच आहे की काय असं वाटू लागतं. एकीकडे रात्रीचे पब्स आणि पार्ट्यांचं कल्चर, पाच इंचाच्या स्क्रीनवर ओला- उबर आणि दुसरीकडे जीव वाचवण्यासाठी साधी एक हातगाडी नसल्याने झोळीत बाळाला घेऊन दवाखान्यात पोहचण्याची धडपड. हा सारा पसारा तसा फार आहे. बरं या साऱ्याच्या मध्ये तुम्ही- आम्ही मध्ये कुठेतरी आहोत. म्हणजे अगदी आपल्याला कमतरताही नाही सुविधांची आणि अगदी वाटेल तेवढा खर्च करुन आपलं माणूस वाचवूच ही शाश्वतीही नाही. याचा विचार करायला गेलं तर डोक्याचा भुगा होतो म्हणतात ना तसं काहीतरी होतं. जेवढा विचार करत जाणार तेवढे आपण लाचार आहोत असं वाटत जाणार असा हा प्रकार.

पण फार काही अपेक्षा ठेवल्या नाही तरी किमान आरोग्य सुविधा गावोगावी नसल्या तरी वर्षातील १२ महिने २४ तास त्या आरोग्य सुविधांपर्यंत पोहचणारे रस्ते तरी नीट असावेत अशी माफक अपेक्षाही आपण ठेऊ शकत नाही का? एकीकडे आपण यमुना एक्स्प्रेसवेवर फायटर जेट उतरवून मोजक्या काही देशांच्या यादीत विराजमान झाल्याबद्दल पाठ थोपटून घेतो पण दुसरीकडे आपल्या बाळाच्या पाठीवर हात थोपटवत त्याला बरं वाटेल असा विचार करणाऱ्या आईला डॉक्टरांपर्यंत नेईपर्यंत बाळ जिवंत राहील नक्की याचा दिलासाही आपण देऊ शकत नाही, असे हे भीषण वास्तव आहे. या दोन फार टोकाच्या गोष्टी आहेत. एकीकडे आपण गिनीज बुकात वगैरे जातोय वेगाने रस्ते बांधल्याबद्दल आणि दुसरीकडे आरोग्य केंद्रात पोहचण्याआधीच अगर्भ दगावतंय. आज आपले मंत्री उडणाऱ्या बस, मेट्रो, कारशेड आणि साऱ्या साऱ्या गोष्टींबद्दल आकर्षक विधानं करताना दिसतात पण दुसरीकडे देशाच्या आर्थिक राजधानीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जिल्ह्यात हे असे दोन मृत्यू होतात हे काळजात सारं धस्स करणारं आहे.

नक्की वाचा >> खड्ड्यांमुळे नवजात अर्भक दगावले; रुग्णालयात पोहोचण्यास विलंब; भिवंडी तालुक्यातील घटना 

एकीकडे महिला सक्षमतेचे सेमिनार घ्यायचे मोठमोठ्या हॉटेल्स- हॉल्समध्ये आणि दुसरीकडे साधी तापाची गोळी नाही म्हणून फणफणल्याने बाळ दगावणार हे सारं फारच अनाकलनीय आहे. त्यात हे असे मृत्यू आणि अकाली मरण महिलांच्या आणि बालकांच्याच नशिबी अधिक. त्याला मग वेळेत उपचार न मिळणं असो, गरोदरपणात आलेलं मरण असो किंवा अंगावर काढलेलं दुखणं असो कारण काहीही असलं तर हे असं मरण वाईटच. हा लेख वाचणाऱ्यांना आणि तो लिहिणाऱ्यालाही स्वातंत्र्य मिळालं आहे जगण्याचं पण या देशातील अनेक असे आहेत ज्यांना साधं जगण्याचं आणि मूलभूत सुविधाचंही स्वातंत्र्य नशिबात नाहीय. त्यांच्यासाठी नेमकी स्वातंत्र्याची व्याख्या काय असावी असा कधी विचार आपण केलाय का?

चांगले रस्ते, दोन वेळेचं जेवणं, मुलं जगण्याची शाश्वती आणि रोजगार एवढ्या माफक अपेक्षा आपण आजही पूर्ण करु शकत नाही तर आपण कोणत्या दृष्टीने स्वत:ला स्वतंत्र्य देशाचे नागरिक म्हणायचं? मी थोड्या फार लोकांना जगण्याचं, स्वत:चे प्राण वाचवण्याचं स्वातंत्र्य असणाऱ्या देशात राहतो हे असं एखाद्याने म्हटलं तर त्याचं नेमकं काय चुकलं? 

मध्यमवर्ग हा आर्थिक स्तर आहे, असं आधी वाटायचं. आता लक्षात आलंय की, ती एक साचेबद्ध विचारसरणी आहे. अगदी आरोग्याच्या बाबतीतही आपण मध्यमवर्गीय मध्येच आहोत… या साऱ्याचा निष्कर्ष अगदी आकडेवारी बाजूला सोडली तरी असा काढता येतो की आपल्याकडे अफाट लोकसंख्या असल्याने अशी काही प्रकरण ‘किरकोळ’ असं असं म्हणत आपण ती वासलात काढतो. त्यामुळे राज्यकर्त्यांना फरक पडत नाही. आणि इतर साऱ्या विषयांप्रमाणे मध्यमवर्गीयांना कोणीतरी येऊन संगितल्याशिवाय आणि त्यांच्या अंगाशी आल्याशिवाय फरकही पडत नाही. हे काय चालतच राहणार… तोपर्यंत आरआयपी RIP म्हणा, सोशल मीडियावर पोस्ट करा आणि पुढे चला… हेच आता आपल्या अंगवळणी पडलंय!

काय वाटतंय तुम्हाला? 

तुमच्या प्रतिक्रिया, कळवा आम्हाला 

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What indian independence means to population who can not even save their love ones due to lack of basic facilities scsg
First published on: 05-09-2022 at 17:33 IST