भारतात १० ते २४ वयोगटातील तरूणांची संख्या ३५.६ कोटी आहे व तरूणांची संख्या सर्वात जास्त असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. चीनपेक्षा कमी लोकसंख्या असूनही येथे तरूणांची संख्या जास्त आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, विकसनशील देशात युवकांची संख्या जास्त असून तेथील अर्थव्यवस्था वाढण्याची आशा आहे. पण त्यासाठी त्यांना शिक्षण व आरोग्य, हक्क संरक्षण यात मोठी गुंतवणूक करावी लागेल. या पिढीत ६० कोटी मुली पौगंडावस्थेतील असून त्यांच्या गरजा, आव्हाने व आकांक्षा यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. ‘द पॉवर ऑफ १.८ बिलियन’ या अहवालात म्हटले आहे की, गरीब देशांमध्ये युवकांची संख्या जास्त आहे. ते १० ते २४ वयोगटातील आहेत. जगात १.८ अब्ज युवक असून त्यात १० ते २४ वयोगटातील युवकांचा समावेश आहे. जगात कमी विकसित देशात १० पैकी ९ जण तरूण आहेत. कौशल्ये, आरोग्य, निर्णय क्षमता व वास्तव पर्याय निवडण्याची क्षमता असेल तर हे युवक देशाचे भवितव्य घडवू शकतात, असे अहवालात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीचे कार्यकारी संचालक बाबातुंडे ओसोटिमेहिम यांनी सांगितले की, १.८ अब्ज युवकांमध्ये भविष्य बदलण्याची प्रचंड शक्ती आहे. युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत व तसे केले तरच आर्थिक फायदा होऊन तरूण लोकसंख्या असल्याचा लाभ मिळू शकेल.तरूणांची संख्याभारतात तरूणांची संख्या ३५.६ कोटी आहे.चीन हा तरूणांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे २६.९ कोटी लोक तरूण आहेत. त्यानंतर इंडोनेशिया (६.७ कोटी) अमेरिका (६.५ कोटी), पाकिस्तान (५.९ कोटी) नायजेरिया (५.७ कोटी). ब्राझील (५.१ कोटी) व बांगलादेश (४.८ कोटी) यांचा क्रमांक लागतो.