ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल-मुस्लमीन (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांचा पक्ष बिहार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे आज जाहीर केले. एमआयएम सीमांचल भागात उमेदवार उभे करणार असून, तेथे विधानसभेच्या एकूण ३८ जागा आहेत. मात्र, यापैकी एमआयएम किती जागा लढवणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. बिहारमध्ये पाच टप्प्यात निवडणूक होणार असून सीमांचल भागात ५ नोव्हेंबर रोजी मतदान होईल.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीमांचल भाग मुस्लीम बहुल आहे. बिहारमध्ये मुस्लीमांचे प्रमाण १७ टक्के असले तरी सीमांचलमध्ये ते सगळ्यात जास्त आहे. येथील काही भागांमध्ये तर हे प्रमाण ७० टक्के आहे. मुसलमान व दलितांचे वर्चस्व असल्याने या जागांवर प्रचंड मतांनी आमचे उमेदवार विजयी होतील अशी अपेक्षा ओवेसी यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र विधानसभा आणि औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीत एमआयएमने लक्षणीय यश मिळवले होते. त्यामुळे आता बिहार विधानसभेत एमआयएम अशीचं कामगार करून दाखवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.