भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज आशिष नेहराने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. आपल्या कारकिर्दीची अखेर घरच्या मैदानावर व्हावी यासाठी फिरोजशहा कोटला मैदानावर खेळण्यात येणाऱ्या टी-२० सामन्यासाठी आपली संघात निवड व्हावी अशी विनंतीही नेहराने बीसीसीआयकडे केली होती. भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतला टी-२० सामना १ नोव्हेंबररोजी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र आशिष नेहराच्या या निवृत्तीच्या मनसुब्यांमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी खोडा घातला आहे.

अवश्य वाचा – आशिष नेहराचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, १ नोव्हेंबरला खेळणार अखेरचा सामना

कोणत्याही खेळाडूची संघात निवड ही त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर केली जावी, संघ निवडीदरम्यान भावनेला जागा देऊ नये असा सल्लाच त्यांनी बीसीसीआयला दिला आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्रात गावसकर यांनी खास स्तंभलेखन केलं आहे. ” नेहराने केलेली निवृत्तीची घोषणा ही भारतीय संघासाठी थोडी त्रासदायक ठरणार आहे. पहिल्या दोन सामन्यांत निवड न करता अखेरच्या सामन्यात नेहराला संघात जागा कशी देता येईल?” असा सवाल गावसकर यांनी विचारला आहे.

अवश्य वाचा – न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, रहाणे-शार्दुल ठाकूरचं पुनरागमन; आश्विन-जाडेजाला वगळलं

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये आशिष नेहरा संघात खेळला नव्हता. त्यामुळे जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारसारखे गोलंदाज असताना ऑस्ट्रेलियासारखी परिस्थीती पुन्हा उद्भवल्यास केवळ अखेरच्या टी-२० सामन्यासाठी नेहराची संघात निवड करत योग्य ठरणार नाही असंही गावसकर यांनी म्हणलंय. याचसोबत पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अखेरचा टी-२० सामना रद्द करण्यात आला होता. यावेळी मैदान सुकवण्यात हैदाबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना अपयश आलं होतं. यावरही गावसकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता बीसीसीआय यानंतर नेमकं कायं निर्णय घेणार आणि टी-२० मालिकेसाठी आशिष नेहराची संघात निवड होणार का हे पहावं लागणार आहे.