भारतातील प्रत्येक सामान्य नागरिकाला माझ्या बद्दल कधीच निराशा वाटू देणार नाही. क्रिकेटमधून निवृत्ती जरी घेतली असली, तरी माझी फलंदाजी सुरूच राहील असे म्हणत भारतरत्न सचिन तेंडुलकरने क्रिकेटमाझा प्राणवायु असल्याने क्रिकेटपासून मी दूर जाणे अशक्य असल्याचे म्हटले आहे.
क्रिकेटसुर्य सचिनला आज (मंगळवार) राष्ट्रपती भवनात भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सचिन म्हणाला की, माझ्या क्रिकेट करिअरला जरी पूर्ण विराम दिला असला, तरी भारतासाठी माझी फलंदाजी सुरूच राहणार आहे. भारतीयांच्या चेहऱयावर हसू उमटेल यासाठी क्रीडा क्षेत्रात यापुढेही माझे योगदान सतत राहील. भारतरत्न हा माझ्यासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा सन्मान आहे. हा पुरस्कार मिळाल्याने मी आनंदी आहे. माझा या देशात जन्म झाला याचा मला अभिमान आहे. गेली कित्येक वर्षे मला मिळालेला पाठिंबा, प्रोत्साहन आणि प्रेम मी कधीच विसरू शकत नाही असेही सचिन म्हणाला.