‘गरज राष्ट्रवादी‘मुक्त’ महाराष्ट्राची!’ हा ६ जुलैच्या ‘लोकरंग’मधील संजय पवारांचा लेख वाचला. लेखकाचे मनापासून अभिनंदन. असंख्य मराठी नागरिकांच्या मनातील कटू, पण सत्य अशी खदखद आपण निर्भयपणे मांडली आहे. या लेखाच्या पुष्टय़र्थ आणखी काही मुद्दे मांडावेसे वाटतात. ते असे- पद्मसिंह पाटील यांच्यासारख्या खुनाचे आरोप असलेल्या आणि ज्यांनी कारगिलच्या हुतात्म्यांचा निधी स्वत:च्या साखर कारखान्याकडे वळवला, अशा देशद्रोही व्यक्तीला शरद पवार खासदार बनवतात. संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघासारख्या जातीयवादी पिलावळीला ते छुपेपणाने पोसतात. ‘आयपीएल’ला करसवलत मिळवून देण्यासाठी साहेब आपले वजन वापरतात. यांच्या सिंचन घोटाळ्यामुळे महाराष्ट्र आज पाणीटंचाईचा आक्रोश करत आहे. मात्र साहेबांना आणखी २६ लवासे स्वप्नांत येत आहेत. यांना काय उपमा द्यावी? आम्हा सामान्यांना या राष्ट्रवादीची प्रचंड चीड आहे आणि हा पक्ष पुरता नेस्तनाबूत झाल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणे शक्य नाही. परखड विश्लेषण कोणाचाही मुलाहिजा न ठेवता संजय पवार यांनी लिहिलेला ‘गरज राष्ट्रवादी‘मुक्त’ महाराष्ट्राची!’ हा लेख अत्यंत परखड आणि योग्य विश्लेषण करणारा आहे. या लेखात बहुतेक सारे काही आले आहे. परंतु, साहेबांनी अपूर्व योगदान दिलेल्या क्रिकेटचा उल्लेख नाही. या क्षेत्रात त्यांनी दालमियांना भ्रष्टाचाराबाबत (! ) शिक्षा देऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळात स्वत:ची हुकूमत स्थापन केली आणि ‘जंटलमेन्स गेम’ हे क्रिकेटचे वर्णन कायमचे पुसले गेले. आता तो राजकारणी, धनदांडगे, सट्टेबाज आणि परदेशात लपलेले गुंड यांच्या ताब्यातील उद्योग झाला आहे. इतर राज्यांतील नेते आणि बडय़ा उद्य्ोगपतींना क्रिकेट हा मोठा उद्योग आहे याची जाणीव साहेबांनीच करून दिली. हा लेख वाचून २००६ मधील एक प्रकरण आठवले. तेव्हा साहेबांना ‘गो-पालक’ हा ‘डी लिट्’पेक्षा मोठा पुरस्कार देण्याचा घाट नागपूरच्या पशुवैद्यक विद्यापीठाने घातला होता. परंतु, विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि केंद्रात कृषीमंत्री असल्याने त्याबाबतची जबाबदारी या कारणांनी तो प्रयत्न फसला. शरद पवार यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून चारही कार्यकाळातील कृषीधोरण या राज्यातील शेतकऱ्यांना उजाड करणारे कसे आहे, याचे वर्णन ज्येष्ठ पत्रकार जगन फडणीस यांनी त्यांच्या ‘शरद पवार : धोरणे आणि परिणाम’ या आता बाजारातून गायब करण्यात आलेल्या पुस्तकात केले आहे. परंतु, संजय पवार यांनी लिहिले ते लक्षावधींपर्यंत पोचले आहे. - मुकुंद नवरे, गोरेगाव, मुंबई