न्यायाधीश विजय आचलिया, पुखराज बोरा यांचे मत केवळ पगार कमविणाऱ्या शिक्षकांऐवजी विद्यार्थी आणि समाज घडविणारे शिक्षक निर्माण होण्याची गरज व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विजय आचलिया आणि पुखराज बोरा यांनी सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये दोष असल्याचे नमूद करत शिक्षण पद्धतीचे पुनर्मूल्यांकन होण्याची गरज मांडली. नंदुरबार तालुका विधायक समितीचे संस्थापक अध्यक्ष जी. टी. पाटील यांच्या स्मृतीनिमित्त येथील शिवाजी नाटय़ मंदिरात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात न्यायव्यवस्थेतील मान्यवरांनी शिक्षण व्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीवर टीकास्त्र सोडत शिक्षण पद्धतीत सुधारणेसाठी सांगोपांग विचार करण्याची गरज मांडली. न्यायाधीश आचलिया यांनी हा विद्यार्थ्यांचा नव्हे, तर त्यांच्या पालकांचा सत्कार असून शैक्षणिक ज्ञानासह व्यावहारिक ज्ञानही आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या पगाराविषयी खटल्याचा दाखला देत शिक्षक पगार कमविण्यासाठी की विद्यार्थी घडविण्यासाठी, असा प्रश्नही उपस्थित केला. न्यायाधीश बोरा यांनी शिक्षणाचा माणूस घडविण्यात उपयोग होत नसेल तर विचारमंथन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. शाळेमध्ये जाणारे ९० टक्के मुले हे शिकवणीला जात असतील आणि महाविद्यालयाच्या वर्गात विद्यार्थीच बसत नसेल आणि तरीही शिक्षक आणि प्राध्यापकांना पगारवाढ हवी असेल तर सांगोपांग विचार करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी त्यांनी उदाहरणासह दाखला देत विद्यार्थ्यांची काळजी घेणारे संस्था चालक राहिले नसल्याने शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन होण्याची गरज मांडली. यावेळी सरकारचे अतिरिक्त महाभियोक्ता अनिल सिंग आणि औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य सरकारी वकील अमरजित सिंह गिरासे यांनी ढासळलेल्या समाजव्यवस्थेवर भाष्य करत ती सुधारण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची आवश्यकता मांडली. यावेळी नंदुरबारचे सत्र न्यायाधीश नितीन बोरकर, भारत सरकारचे माजी अतिरिक्त अभियोक्ता अॅड. राजेंद्र रघुवंशी, महाराष्ट्र राज्य बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, आमदार चंद्रकांत रघुवंशी आदी उपस्थित होते.