केंद्रात भाजपचे सरकार येऊन एक वर्ष लोटले, तर राज्यातही भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार येऊन सहा महिन्यांचा काळ उलटला तरी केंद्रातील व राज्यातील सरकार शेतकरी विरोधी धोरण आखत आहे. अशा या नाकर्त्या सरकारच्या विरोधात भूमिका घेण्याऐवजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे दलालाची भूमिका घेऊन सरकारला शंभरपैकी ४० गुण देत आहेत. खासदार शेट्टी यांना शेतकऱ्यांविषयी जर थोडीशीही चाड असेल तरी त्यांनी महायुतीतून बाहेर पडून आपला स्वाभिमानी बाणा दाखवून द्यावा, असे आव्हान बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते संजय पाटील-घाटणेकर यांनी दिले. यासंदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले,की एकीकडे राज्यातील व केंद्रातील भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेत असताना त्याविषयी खासदार शेट्टी यांनी कणखर भूमिका घेऊन भाजपला धडा शिकविण्याऐवजी केवळ लाल दिव्याच्या गाडीच्या हव्यासापोटी ते दलालाची भूमिका बजावत आहेत. परंतु त्यामुळे फसलेला शेतकरी आता पुन्हा भुलणार नाही, असा विश्वास घाटणेकर यांनी व्यक्त केला.भाजप सरकारने हातचलाखी करून महायुतीअंतर्गत सत्तेचा वाटा देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांना राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद दिले आहे. या महामंडळात एक छदामही नाही. वस्त्रोद्योग महामंडळ म्हणजे ओसाड गावची पाटीलकी देण्यासारखे आहे. वास्तविक पाहता शेतीविषयी महामंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला द्यायला हवे होते. पण ते न देता दुसरेच बिगर महत्त्वाचे महामंडळ दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खरे तर आपला स्वाभिमान दाखवून देणे अपेक्षित होते, अशी टीका संजय पाटील-घाटणेकर यांनी केली. लोकसभा निवडणुकीत मतभेद झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेले संजय पाटील-घाटणेकर यांनी सोलापूर जिल्ह्य़ात ऊस व दुधाच्या प्रश्नावर बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन हाती घेण्याचे ठरविले आहे. सोलापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून या निवडणुकीत बळीराजा शेतकरी संघटना उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्य़ात कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना आता जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत केवळ मलई खाण्यासाठी एकत्र येत असतील तर त्याविरोधात आवाज उठविला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.