संजना संजय जयस्वालचे संशोधन; भारताचे प्रतिनिधित्व करताना लंडनला सादरीकरण महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त व मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोलीत सिकलसेलग्रस्तांची संख्या मोठी आहे. नागपूरच्या ‘एमबीबीएस’ अंतिम वर्षांला शिकणाऱ्या संजना संजय जयस्वालने सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या गडचिरोलीतील ‘माडिया गोंड’ जमातीच्या सिकलसेलग्रस्तांवर अभ्यास केला. त्यात ७६ टक्के रुग्णांत ‘ड’ जीवनसत्व कमी असल्याचे पुढे आले. जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करताना हे संशोधन तिने लंडनच्या ‘अकादमी फॉर सिकलसेल अॅन्ड थॅलेसेमिया’ या परिषदेत सादर केले. गडचिरोलीतील माडिया गोंड जमातीत सर्वाधिक सिकलसेलचे रुग्ण आढळतात. तेव्हा नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)च्या अंतिम वर्षांला शिकणाऱ्या संजनाने संशोधनाकरिता या जमातीची निवड केली. राष्ट्रीय आरोग्य अभियान, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्यातून गडचिरोली जिल्ह्य़ातील माडिया गोंड समाजातील २१० सिकलसेलग्रस्तांवर अभ्यास करण्यात आला. यासाठी साधारणपणे ५ ते १८ वयोगटातील रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात ६३ टक्के सिकलसेल व्याधीग्रस्तांची आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकाकडून गडचिरोलीला केली. अहवालात ६३ टक्के सिकलसेलव्याधीग्रस्त मुलीमध्ये ‘ड’ जीवनसत्वाचा अभाव असल्याचे आढळले. अभ्यासाकरिता मेयो व आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकांनी परिश्रम घेतले. संशोधनाची दखल लंडन येथे ५ ते ७ ऑक्टोबरला पार पडलेल्या ‘अकादमी फॉर सिकलसेल अॅन्ड थॅलेसेमिया’च्या जागतिक परिषदेत घेण्यात आली. जगभरातील २७ देशांतील प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला होता. त्यात भारताकडून संजनाने संशोधन निबंध सादर केला. आजपर्यंत एमबीबीएसची पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अशी संधी मिळाली नव्हती. मेयोच्या बालरोग विभागप्रमुख डॉ. दीप्ती जैन यांच्या मार्गदर्शनात संजना जयस्वाल यांनी विशिष्ट समाजातील व्याधीग्रस्तांना भेडसावणाऱ्या प्राचीन अशा आरोग्य समस्येवर प्रकाश टाकला. पुढे या संशोधनाचा संदर्भ घेत इतरही अभ्यास आरोग्य विभागाकडून होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.