शहरातील ६०० तर ग्रामीणच्या ३५१ जणांचा समावेश; गडचिरोलीत दगावलेल्यांचा टक्का वाढला केंद्र व राज्य शासनाकडून माता, बाल व उपजत मृत्यू कमी झाल्याचा दावा होत असला तरी पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्य़ात ९५१ तर गडचिरोली ५५८ उपजत मृत्यूंची नोंद आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. गडचिरोलीत गेल्यावर्षीच्या तुलनेत उपजत मृत्यू वाढले आहेत, हे विशेष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात महापालिकेच्या नोंदीत ६०० तर नागपूरच्या ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य विभागाकडे ३५१ असे एकूण ९५१ उपजत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शहराची निवड स्मार्ट सिटीत होत असतांना एवढे मृत्यू येथे होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. गडचिरोलीत चालू वर्षांत आतापर्यंत १६ हजार ५७७ महिला प्रसूत झाल्या. त्यापैकी ५५८ बालके गरोदरपणातल्या गुंतागुंतीमुळे गर्भातच दगावले. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या १३९ ने वाढली आहे. या आदिवासीबहुल जिल्ह्य़ानंतर चंद्रपूरनेही उपजत मृत्यूत आघाडी घेतली आहे. येथे ४२८ बालके आतापर्यंत गर्भातच दगावली. चंद्रपुरात या काळात २२ हजार २२ स्त्रिया प्रसूत झाल्या. नागपूरच्या ग्रामीण भागात प्रसूत झालेल्या २८ हजार ६९९ स्त्रियांपैकी ३५१ बालके मृतावस्थेत जन्माला आली. पूर्व विदर्भातील केवळ वर्धा जिल्ह्य़ाने सुरक्षित बाळंतपणामध्ये समाधानकारक कामगिरी नोंदविली आहे. येथे गेल्यावर्षी १५३ बालके उपजत मृत्य झाली होती. यावर्षी येथे ही संख्या १११ पर्यंत खाली आली.