देशासाठी आणि देशातले नागरिक सुरक्षित राहावे, यासाठी सीमेवर जवान लढतात, वेळप्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देतात. या जवानांसाठी आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांसाठी छोटी का होईना पण मदत करणं आपली जबाबदारी आहे, नाही का? आणि आपल्या याच जबाबदारीचे भान राखत गुजरातमधल्या जनार्दन भट्ट या निवृत्त कर्मचाऱ्याने एक कोटींची रक्कम राष्ट्रीय सुरक्षा निधीला दान केली आहे. ८४ वर्षांचे असलेले जनार्दन आणि त्यांच्या पत्नीने मिळून हा निर्णय घेतला आहे. आपल्या आयुष्यभरात या जोडप्याने जी काही बचत केली ती बचत एकत्र करून जमलेली रक्कम जवनांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देऊ केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जनार्दन टीव्हीवर शहिद जवानांच्या बातम्या ऐकत होते. देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांच्या बातम्या दररोज वर्तमानपत्रात त्यांना वाचायला मिळत होत्या. तेव्हा देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांच्या उपकारांची परतफेड म्हणून त्यांनी मदत करण्याचे ठरवले. जनार्दन हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी कर्मचारी आहेत. आपली आयुष्यभराची कमाई जवानांना देत एक नवा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला आहे. अशाप्रकारे एखाद्याला मदत करण्याची जनार्दन यांची ही काही पहिलीच वेळ नाही. काही वर्षांपूर्वी आपल्या एका सहकाऱ्याला मदत करण्याऱ्यासाठी त्यांनी ५४ लाखांची मदत गोळा केली होती.