चोरी, कपट, दगाबाजी अथवा गहाळ फोन-पाकीटासाठी
पाकीट मारले जाणे अथवा किमती स्मार्टफोन गहाळ होणे हे केवळ आर्थिक नुकसान आहे काय? उत्तर होय असेल तर सामान्य विमा पॉलिसीमधून त्याची पुरेपूर भरपाई निश्चितच होईल. पण वस्तुत: पाकिटातील रोख नोटांव्यतिरिक्त वेगवेगळ्या बँकेची एकापेक्षा अधिक क्रेडिट-डेबिट कार्ड्स, शिवाय असलाच तर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे दस्तावेज आणि हरविलेल्या मोबाईल फोनचे सिम कार्ड, फोनमध्ये जतन केलेल्या शेकडो क्रमांकासह अन्य महत्त्वाचा डेटा यांची भरपाई विमा कंपनीकडून होणे अशक्यच! अशा गोंधळ उडवून देणाऱ्या समयी सर्व चिंतांवर नेमका उतारा देणारा मदतकारक हात ‘वन असिस्ट कन्झ्युमर सोल्यूशन्स’च्या रूपाने पुढे आला आहे.
नावाप्रमाणे ‘वन कॉल, वन स्टॉप’ (www.oneassist.in) धाटणीचा उपाय प्रस्तुत करणारी ही सेवा अलिकडेच सुरू झाली असून, क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या सुरक्षा योजनाच काय विम्याच्या सुरक्षा कवचापेक्षा खूप काही ती ग्राहकांना देऊ करते. खिशातील पाकीटापासून, मोबाईल फोन आणि महत्त्वाच्या दस्तावेजांच्या सुरक्षिततेची काळजी घेणारे हे सेवा दालन वनअसिस्ट कन्झ्युमर सोल्यूशन्सने ‘वॉलेट असिस्ट’, ‘मोबाईल असिस्ट’, ‘एव्हरी डे असिस्ट’ आणि ‘ट्रिप असिस्ट’ अशा चार वेगवेगळ्या अंगातून खुले केले आहे.
वित्तीय सेवा क्षेत्रात जवळपास २० वर्षांच्या अनुभव गाठीशी असलेल्या गगन मैनी आणि सुब्रत पनी या तरुण संस्थापक जोडगोळीने ‘सीकोया कॅपिटल’ या साहस भांडवल क्षेत्रातील अग्रेसर संस्थेकडून मिळालेल्या बीज भांडवलातून ‘वन असिस्ट’ सेवा कार्यान्वित केली आहे. देशातील सर्वात मोठी क्रेडिटकार्ड वितरक असलेल्या व दुसऱ्या क्रमांकाची खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या कार्डधारकांसाठी या सेवेचे कवच मिळविणारे सामंजस्य ‘वन असिस्ट’शी केले असून, अ‍ॅक्सिस बँकेबरोबर बोलणी सुरू असल्याचे सुब्रत  यांनी सांगितले.
आजच्या घडीला देशात जवळपास २३ कोटी डेबिट कार्डधारक आणि जवळपास दोन कोटी क्रेडिट कार्डधारक आहेत. अनेकांकडे एकावेळी एकापेक्षा अधिक प्लास्टिक कार्ड असण्याची शक्यताही मोठी आहे. हरविलेल्या पाकिटाबरोबर गहाळ झालेल्या या कार्डाचा गैरवापर टाळण्यासाठी प्रत्यक्ष त्या सर्व बँकांच्या कॉल सेंटरला संपर्क साधून ते कार्डचा वापर थांबविण्याचे दिव्य त्या कार्डधारकाला विनाविलंब पार पाडावे लागते. ‘वन असिस्ट’च्या सदस्यांना मात्र केवळ एका क्रमांकाशी संपर्क साधून या समस्येवर त्वरित समाधान मिळविता येईल, असे सुब्रत यांनी सांगितले. इतकेच नव्हे पाकिटाबरोबर गहाळ झालेले ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड परत मिळविण्याची तजवीज कंपनीकडून केली जाईल. घरापासून दूर परक्या शहरात अथवा जगाच्या पाठीवर कुठेही पाकीट गहाळ झाले असेल, तर खर्च चालविण्यासाठी आवश्यक ती रोख रक्कमही ‘वन असिस्ट’द्वारे सच्चा सोबत्याप्रमाणे पुरविली जाईल.
‘वॉलेट असिस्ट’ सेवेत दोन लाख रुपयांपर्यंतच्या नुकसान भरपाईचीही सोय आहे आणि त्यासाठी आयसीआयसीआय लॉम्बार्डकडून विमाही उतरविला जातो. परंतु आर्थिक भरपाईपेक्षा, आगामी अनेक प्रकारच्या कटकटी सोडविणारी निश्चिंतता ही अशा समयी खूप महत्त्वाची असते आणि तीच पुरविण्याचा आपला हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. ‘एव्हरी डे असिस्ट’ सेवेत सदस्यांना सुरुवातीलाच प्रदान केल्या जाणाऱ्या १ गिगाबाइट्सच्या स्टोरेज स्पेसमध्ये महत्त्वाची सर्व दस्तावेजांच्या स्कॅन केलेल्या प्रती सुरक्षितपणे आणि लॉग-इनद्वारे केव्हाही-कुठूनही अ‍ॅक्सेस करता येतील. हे एक प्रकारे महत्त्वाच्या दस्तावेजांच्या सदासर्वदा सहजसाध्य ऑनलाइन तिजोरीसारखेच असल्याचे सुब्रत यांनी स्पष्ट केले. या सेवेव्यतिरिक्त, स्मार्ट फोन हरविले असल्यास, त्यावर नमूद सर्व डेटा, संपर्क क्रमांक, एसएमएस, फोटो आणि व्हिडीओ तसेच व्यक्तिगत माहितीचे संरक्षण केवळ एका क्रमांकाशी संपर्क साधून करता येईल. शिवाय हा सर्व तपशील त्यांना नव्या हँडसेटमध्ये केवळ एक कळ दाबल्यासरशी पुन्हा जसाचा तसा मिळविता येईल.
वन असिस्ट या विविध सेवा सशुल्क असून वार्षिक रु. १०९९ ते रु. १४९९ भरून सदस्यत्व मिळविता येईल. आगामी वर्षभरात एक लाख सदस्य मिळविण्याचे आपले लक्ष्य असल्याचे सुब्रत यांनी सांगितले. आगामी काळात बँकांव्यतिरिक्त, मोबाईल सेवा प्रदाते, सहल आयोजक, ट्रॅव्हल एजंट्सबरोबर सामंजस्यातून आपल्या सेवांचा व्याप विस्तारण्याचे नियोजन आहे. सध्या या सेवांना मागणी पाहता तीन-चार वर्षांत सदस्यसंख्या पाच लाखांवर निश्चितच जाईल, असा विश्वास म्हणून ते ठामपणे व्यक्त करतात.