मराठवाडा मुक्ती दिनी घोषणा होण्याची शक्यता

औरंगाबाद : मराठवाडय़ातील वाहतुकीचा वेग वाढविणारा औरंगाबाद- नगर हा नवा रेल्वे मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून प्रस्तावित केला जाणार असून त्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त करतील, अशी तयारी सुरू झाली आहे. औरंगाबाद- मनमाड-नगर असा रेल्वेचा प्रवास २६५  किलोमीटरचा होता. नव्या मार्गामुळे ११२ किलोमीटरचे अंतर कमी होईल असा दावा करत हा नवा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. स्टील, कृषी, वाहन उद्योग, प्लास्टीक आणि पॅकेजिंग या क्षेत्रात होणारी वाढ लक्षात घेता हा मार्ग अधिक उपयोगी पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अनेक उद्योगांशी चर्चा केल्यानंतर हा नवा प्रस्ताव तयार केला असून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या भाषणात या प्रस्तावाला हिरवा कंदिल मिळण्याची शक्यता आहे. या मार्गासाठी आवश्यकता भासल्यास उद्योग मंत्रालयाकडूनही निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही अलीकडेच पत्रकारांना सांगितले.

गेल्या पाच वर्षांत औरंगाबाद विभागातून केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीत ३५ हजार कोटी रुपयांचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा झाला होता. हा नवा मार्ग झाला तर इंधन वाचेल आणि पुण्यापर्यंत कच्चा माल पोहोचविण्याची सुविधा वाढणार आहे. पुढील २५ वष्रे होणारी औद्योगिक वाढ गृहीत धरून डीएमआयसीचे केलेले नियोजन लक्षात घेता या मार्गाचा अधिक उपयोग होईल असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. औरंगाबाद- पुणे या मार्गावर दोन रेल्वे गाडय़ामधून २०१८-१९ सरासरी १९५१ प्रवासी होते तर सरासरी एक लाख २३ हजार ४६० रुपये प्रतिदिन रक्कम मिळत असे. २०१९- २० मध्ये त्यात वाढ झाली होती.

ल्ल प्रतिदिन सरासरी प्रवासी आता दोन हजार १३४ वर गेली आहे. पण  रेल्वेपेक्षाही कार, दुचाकी, बस, तीन चाकीमधून होणारी मालवाहतूक, मालमोटारी आणि मोठय़ा मालमोटारी अशी वाहतूक टोलनाक्यावरून मोजली असता ती ३८ हजार असल्याचे दिसून आले होते. रेल्वेऐवजी होणारी ही वाहतूक करत असलेले प्रदूषणही अधिक असल्याने हा मार्ग आवश्यक असल्याचा दावा केला जात आहे.  यातील काही वाहतूक जरी रेल्वेमार्गे झाली तरी प्रदूषण कमी होईल असेही सांगण्यात येत आहे. या प्रकल्पाची चर्चा मुख्यमंत्र्याशी झाली असल्याने मराठवाडा मुक्ती दिनी यावर सरकारकडून  भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे.