औरंगाबाद : करोना रुग्णांच्या सकारात्मकतेचा दर कमी असल्याने निर्बंध हटविण्यात आले असले, तरी दुकानांमधून प्रसार होऊ म्हणून सात दिवसांत दुकानदारांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. प्राणवायूची कमतरता पडू नये म्हणून औरंगाबाद, वाळूज, वैजापूर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, पैठण, करमाड, बिडकीन आदी ठिकाणी प्राणवायू प्रकल्प उभे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी लागणारे निवाऱ्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यतील उपविभागीय अधिकारी यांची बठक घेतल्यानंतर ग्रामीण भागात कशी तयारी करायची, याचा आढावा घेण्यात आला. औरंगाबाद शहरातील अभियंत्याकडून प्राणवायू प्रकल्प उभारणीसाठी तांत्रिक साहाय्य घ्यावे असेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी ग्रामीण भागातील अधिकाऱ्यांना सांगितले.

ग्रामीण भागात हॉटेलमध्ये ५०  टक्के आसनक्षमतेच्या नियमांचे पालन केले जावे असेही त्यांनी सांगितले. हॉटेलच्या दर्शनीभागात त्याची माहिती लावावी असेही ते म्हणाले. सध्या निर्बंध हटविले असल्यामुळे दुकानदारांमार्फत करोना प्रसार होऊ शकतो. त्यामुळे करोना चाचणी करून घेणे अपरिहार्य असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान मंगळवारीही शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी होती. त्यामुळे निर्बंध नको असतील तर नियम पाळणे आवश्यक असल्याचे महापालिका प्रशाासनाने म्हटले आहे. प्रशासकीय पातळीवर केलेल्या प्रयत्नांमुळे दुसऱ्या लाटेवर आता नियंत्रण मिळू लागले आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरात रविवारी केवळ ३८  रुग्ण तर ग्रामीण भागात १०५ रुग्ण आढळून आले आहेत.  त्यामुळे संसर्ग कमी करायचा असेल तर मुखपट्टी वापरणे, अंतर नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात संसर्ग कमी करण्यासाठी जागृती करावी तसेच लसीकरणवरही जोर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.