छत्रपती संभाजीनगर : राज्यातील विविध जिल्ह्यात उसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या साडेतीन लाख उसतोडणी महिलापैकी काही जणींच्या गर्भ पिशवी काढण्याच्या प्रकाराला आळा घालत या महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी आता बीड जिल्ह्यात आरोग्य मित्र नावाचा उपक्रम आखण्यात आला आहे. तोडणी मजुरांच्या टोळीतील एका महिलेस आता ‘आरोग्य मित्र’ बनवले जाणार आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या उपक्रमाची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना दिली.
बीडसह मराठवाड्यात बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवावी असे आवाहन करत चाकणकर यांनी तोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांच्या आरोग्याचे प्रश्न हाताळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. या बैठकीस उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके आदींची यावेळी उपस्थिती होती.
राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्या आदींबाबत महिला आयोगाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे, बीडसह मराठवाडयातील अनेक जिल्हयात ऊसतोड महिला कामगार स्थलांतर करतात, त्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या समोर आल्या आहेत, यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या संकल्पनेतून यावर्षी ‘आरोग्य मित्र’ उपक्रम राबविण्यात येत आहे, या उपक्रमांतर्गत ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलेसाठी त्याच समुहातील एकाची आरोग्य मित्र म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.
आरोग्य मित्र ऊसतोड महिलेला येणाऱ्या आरोग्याच्या समस्याबाबात गावातील आशासेविका तसेच अंगणवाडी सेविकांच्या संपर्कात असेल. तोडणीस जाणाऱ्या महिलेची आरोग्य तपासणी करुन तिची माहिती ज्या गावी स्थलांतर होणार आहे, तेथील अंगणवाडी सेविकेला आरोग्य मित्रने द्यावी अशी रचना यामध्ये करण्यात आली आहे.
तोडणीच्या काळात मासिक पाळी आल्यास काम बुडते म्हणून गर्भ पिशव्या काढण्याच्या शस्त्रक्रिया बीडमध्ये मोठ्या प्रमाणात होतात. यावर नियंत्रण मिळवत आरोग्य समस्येवर या वर्षी काम होईल असा दावा बीड प्रशासनाकडून केला जात आहे. गेल्या काही वर्षात जनजागृतीच्या आधारे गर्भपिशव्या काढण्याचे प्रमाण कमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, तोडणीला जाण्यापूर्वी महिलांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यात ज्या महिलांचे प्रश्न किचकट होऊ शकतात, अशा महिलांना स्थलांतरीत गावात उपचार देण्याची यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.’