औरंगाबाद: करोनातील डेल्टा उत्परिर्वितत विषाणू आणि ओमायक्रॉन याची सरमिळस होत आहे. या दोन रुग्णांमधील फरक ओळखून त्याची टक्केवारी कळणे हा महत्त्वपूर्ण विषय सध्या असल्याने या दोन रुग्णांमधील भेद करणारे कीट वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निर्बंध पाळणे महत्त्वाचे आहे. पण डेल्हा उत्परिवर्तित विषाणूची संख्या वाढली तर प्राणवायूची गरज वाढते. दोन्ही विषाणूंवरील उपचार पद्धती भिन्न आहेत. त्यामुळे निर्बंध वाढूही शकतात, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिला. गेल्या बैठकीत टाळेबंदीवर चर्चा झाली नाही. त्यात खाटांची क्षमता, प्राणवायू निर्मितीचे प्रकल्प याचा आढावा घेण्यात आला. पुढील आठवड्यातही बैठक होणार आहे. जर प्राणवायूची मागणी ७०० मेट्रिक टनापेक्षा अधिक झाली तर टाळेबंदी आपोआप लागेल.खरे तर निर्बंधाचे पालन करायला लावणे हे आता आव्हान आहे. मुंबई, ठाणे, पुणे येथील संक्रमण अधिक आहे. अजूनही शाळा, महाविद्यालयांवर निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. पण निर्बंध वाढविले जाऊ शकतात.यामध्ये सिनेमा हॉल, हॉटेल, शाळा, महाविद्यालयांचा समावेश असू शकतो. सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. कोणती लस कोणत्या वयोगटाला द्यायची, हे केंद्र सरकारकडून ठरविले जाते. मात्र, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत बनावट लसीकरणाला आळा घालण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे मत मांडणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. औरंगाबाद येथे महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमासाठी ते औरंगाबाद येथे आले होते.