छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्हा काही जणांच्या कार्यशैलीमुळे बदनाम झाला. येथे विकासाच्या अनेक संधी आजही आहेत. त्यासाठी काही कठोर निर्णयांची गरज आहे. तसेच धार्मिक पर्यटनात जिल्ह्यात मोठी संधी आहे. यातून रोजगार निर्मितीला हातभार लागेल.
जिल्ह्यात देशातील प्रमुख तीर्थस्थळे असून, देशपातळीवर एकमेव असे मयूर अभयारण्य आहे. त्या अर्थाने जिल्ह्यात तीर्थाटन आणि पर्यटनात विकासाच्या अनेक संधी असून, जोडीला शेतीपूरक उद्याोगांची उभारणी गरजेची आहे. येथील तुतीच्या शेतीतून तयार झालेली रेशीमची बाजारपेठ विदर्भातील शेतकऱ्यांना आकर्षित करते. जिल्ह्यात विमानतळ उभारण्याची घोषणा अलीकडेच करण्यात आली. हैदराबाद-परभणीकडे जाणारे दोन प्रमुख रेल्वे मार्ग अस्तित्वात असून, त्यातही आता दुहेरी मार्ग तयार झालेले आहेत. याशिवाय नवीन परळी-बीड-अहिल्यानगर हा एक महत्त्वाचा रेल्वेमार्ग आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. धुळे-सोलापूर, विशाखापट्टणम असे राष्ट्रीय महामार्गही जिल्ह्यातून गेलेले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार ८०२.९८ किमीचे राष्ट्रीय महामार्ग, १०५ किमीचा प्रमुख राज्य महामार्ग, ७५४.५५ किमीचा राज्य महामार्ग व २ हजार ५०.९७ किमीचे जिल्हा रस्ते असल्याने पर्यटन आणि तीर्थाटनाला अनुकूल असे मजबूत रस्त्यांचे जाळे लाभले आहे.
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचमस्थानचे वैद्यानाथ ज्योतिर्लिंग हे परळी येथे असून, यादवकालीन स्थापत्य रचनेतील मंदिर देखणे आहे. २८८ कोटींचा विकास आराखडा मंजूर आहे. कोकणवासीयांची प्रमुख देवी योगेश्वरी, देशातील शनीच्या साडेतीन पीठांपैकी एक असलेले राक्षसभुवन येथे गोदावरीच्या तीरावर वसलेले शनीचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. बालाघाट डोंगररांगांच्या कुशीतील कपिलधार येथे संत मन्मथ स्वामींची संजीवन समाधी आहे. येथील धबधबे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. पावसाळ्यात परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो. पाटोद्यातील मयूर अभयारण्य देशातील एकमेव आहे. सात ते आठ हजार मोरांचा अधिवास आढळतो. सौताडा येथील धबधबाही अत्यंत मोहक. बीडमधील खजाना विहीर व कंकालेश्वर मंदिर, धारूर येथील जल, गड व भुई, त्रिकोट, असा किल्ला ऐतिहासिक पाऊलखुणा जपून आहे.
सिंचन क्षेत्र वाढले
सिंचन क्षेत्र वाढत असल्याने ऊस उत्पादकांचा आलेखही वाढता आहे. जिल्ह्यात मार्चअखेर १३ सहकारी कारखाने होते. २०२३-२४ अखेर ३९.६१ लाख मे. टन उसाचे गाळप करून ३.२५ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात २०२३-२४ अखेर एकूण २३८ नोंदणीकृत व चालू कारखाने होते व त्यात ७ हजार ५७४ कामगार होते.
प्रतिमेला धक्का
परळीतील स्त्रीभ्रूण हत्येमुळे जिल्हा चर्चेत आला. त्यानंतर ऊसतोड मजुरांचे प्रश्न, त्या महिलांना काढाव्या लागणाऱ्या गर्भपिशव्यांचा मुद्दा दरवर्षी चर्चेत असतो. त्यावर बैठका घेतल्या जातात मात्र ठोस निर्णय होत नाही. याखेरीज बालविवाह हीदेखील जिल्ह्यातील मोठी समस्या आहे. अलीकडे काही राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्यांमुळे जिल्ह्यांतील गुंडगिरीची राज्यभर चर्चा झाली.
दृष्टिक्षेपात जिल्हा
●क्षेत्रफळ – १० हजार ६९३ चौ. किमी.
●पेरणीचे निव्वळ क्षेत्र – ३.६७ लक्ष हेक्टर
●२ मोठे, १६ मध्यम व १७० लघु प्रकल्प
●दरडोई उत्पन्न (निव्वळ) १ लाख ६० हजार ९५६
●एकूण लोकसंख्या २५.८५ लाख (२०११ जनगणनेनुसार)
●२९ वर्गीकृत बँका व ७५ शाखा