आमदार सुजितसिंह ठाकूर यांची माहिती

उस्मानाबाद : कायम दुष्काळाशी सामना करत असलेल्या मराठवाडय़ाच्या हक्काच्या पाणी प्रश्नासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक बुधवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झाली. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय या बठकीत झाला. या उपोषणात देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार आहेत. फडणवीस सरकारच्या काळात मराठवाडय़ाच्या दुष्काळमुक्तीसाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या. मात्र राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या सरकारमधील नेत्यांचा बहुतेक वेळ एकमेकांवर कुरघोडी करण्यातच जात आहे. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे या सरकारचे दुर्लक्ष होत आहे.

फडणवीस सरकारच्या काळात मराठवाडय़ाच्या विकासाला गती मिळाली होती. पण आता मात्र, या विभागाच्या विकासाचे काय होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनात मराठवाडय़ातील सर्व नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्या

मराठवाडय़ाला हक्काचे पाणी द्यावे, मराठवाडा विभागाचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी एक हजार कोटी रुपये अतिरिक्त द्यावेत, जलयुक्त शिवार योजना पुढे चालू ठेवावी आणि प्रभावीपणे राबवावी, महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटरग्रीड योजना तातडीने सुरू करून अकरा धरणे लूप पद्धतीने जोडावीत, मराठवाडय़ाची पाण्याची तूट भरून काढण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असून त्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी, जायकवाडी धरणात पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी उपलब्ध करून कालव्याद्वारे सिंधफणा व वाण उपखोऱ्यांमध्ये सोडावे, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करावा, सिंचन अनुशेष आणि पाण्याची तूट भरून काढावी, या विभागाला देय असलेले अनुशेष अनुदान तातडीने द्यावे, फडणवीस सरकारने मंजूर केलेली औरंगाबाद शहराची एक हजार ६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करावी व बीड जिल्ह्याचा आरक्षित पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशा मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.