छत्रपती संभाजीनगर : समाजकल्याण विभागाचा निधी कापणे चूकच असल्याचे सांगत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी संजय शिरसाट यांनी बाजू घेतली. लाडक्या बहिणींना पैसे द्यावेतच, पण समाजकल्याणच्या निधीस कात्री लावणे चूकच असल्याचे आठवले म्हणाले.
निधी नसल्याने मंत्रालयच कशाला हवे, असा संतप्त सवाल करत शिरसाट यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. मंत्री शिरसाट यांनी रागाने ती भूमिका मांडली असेल. खाते बंद करण्याच्या वक्तव्यामागेही ही भावना असावी. लाडक्या बहिणींना १ हजार ५०० ऐवजी २ हजार १०० रुपये द्यायला हवे. पण यातील निधी वळविणे चुकीचेचे आहे. दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार आमच्या पक्षात आले तर आनंदच आहे. मात्र, असे होण्याची शक्यता कमीच आहे.
राज आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय युती होण्याची शक्यता कमी आहे. तसे झाले, तर महाविकास आघाडीला अधिक फटका बसेल. राज ठाकरे यांना काँग्रेस स्वीकारणार नाही, असे भाकीतही आठवले यांनी वर्तवले. दरम्यान, संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षास महायुतीमध्ये १० ते १२ जागांची मागणी करू, असेही आठवले म्हणाले.