छत्रपती संभाजीनगर : सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते दंगलीस प्रोत्साहन देत आहेत. सारे घडवून आणले जात आहे. हे सारे राज्य हिताचे नाही. कायदा व सुव्यस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या राज्य सरकारच्या पक्षाचे कार्यकर्तेच दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे वातावरण निर्माण करत आहेत, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर व कोल्हापूरमधील दंगलीवरून राज्य सरकारवर पत्रकार बैठकीत टीका केली.
अहमदनगरमध्ये औरंगजेबाचा फोटो मिरवला तर त्याचे आंदोलन पुण्यामध्ये केले जाते. कोल्हापूरमध्ये समाजमाध्यमांमधील मजकुरावरून धार्मिक तेढ निर्माण केली जाते. हे सारे घडवून आणले जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. विधानसभा निवडणुकांसाठी मतदान करताना जनता वेगळा विचार करत आहे. भाजपविरोधी मतदान होत असल्याने विधानसभा व लोकसभा निवडणुकां एकत्रित होण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. अनेक राज्यात भाजपची सरकारे नाहीत. कर्नाटक निवडणुकीनंतर विधानसभेतील मतदानाचे प्रारूप लक्षात घेता लोकसभेबरोबर ते विधानसभेच्याही निवडणुका घेणार नाहीत असेही पवार म्हणाले. महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या अनुषंगाने निवडून येण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक जागा मागण्याकडे कल असतो. पण तसे न करता ही बोलणी व्हावी. त्यासाठी प्रत्येक पक्षातून दोन जणांची निवड करण्यात आली आहे. ती चर्चा सुरू आहे. १९७७ साली लोकांसमोर पर्याय नव्हते. तरीही त्यांनी सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्याचा निर्णय घेतला. २०२३ आणि १९७७ मधील स्थितीमध्ये बरेच साम्य दिसत असल्याचेही पवार म्हणाले.




‘पेशव्यांच्या बाजूचे सरकारमध्ये अनेक जण’
बाजीराव पेशव्यांना विसरून चालणार नाही. जंजिरा किल्ला त्यांनी मुक्त केला होता, असे वक्तव्य केले होते. त्यावर आक्षेप घेतले जात असल्याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते मिश्कीलपणे म्हणाले, की पेशव्यांविषयी आस्था असणारा एक पक्ष सध्या सरकारमध्ये आहे. कुलगुरूंच्या यादीवर नजर टाकली तरी ते सहजपणे कळेल. या त्यांच्या वक्तव्यावरून आता कुलगुरूंच्या नियुक्त्यांमध्ये ‘जात’ हा निकष असल्याचे पवार यांनी हसत हसत सुचविले. मागील राज्यपाल जरा जास्त बोलके होते असेही पवार तिरकसपणे म्हणाले
नितीन गडकरी यांचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी यांच्या कामाची शैली योग्य असून ते आपल्याला आवडतात. ते कोणत्या पक्षाच्या नेत्याने प्रश्न मांडला आहे वा सांगितला आहे, याच्याकडे लक्ष न देता समस्या समजावून घेऊन त्यावर उत्तर शोधतात. गेल्या नऊ वर्षांतील त्यांनी आपल्या खात्यामधील कामेही अधिक चांगली केली असल्याचे सांगत शरद पवार यांनी गडकरी यांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांच्या कार्यकाळातील कोणत्या मंत्र्यांचे कामकाज तुम्हाला आवडले असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकार बैठकीत विचारला असता त्यांनी नितीन गडकरी यांचे कौतुक केले. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार बैठकीत ते बोलत होते.