समृद्धी महामार्गामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी वाट नसल्याने शेतातीत पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. यासाठी सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आंदोलन केलं आहे. मात्र, अद्यापही याची दखल घेण्यात आली नाही. त्याच पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी सिन्नर तालुक्यातील सायळे, दुसंगवाडी येथील समृद्धी महामार्गाची पाहणी केली. तसेच, परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. संभाजीराजे म्हणाले, “शेतात पाणी जात असल्याने शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचवणार आहे. समृद्धी महामार्गाबद्दल ज्यांचा अभ्यास आहे, त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या समस्या दूर कराव्यात. या शेतकऱ्यांचा आवाज दाबून चालणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे.”
हेही वाचा : “…तर बामणाने मंत्र म्हटल्याप्रमाणे होईल”, मी द्वीअर्थी बोलणारच म्हणत गुलाबराव पाटलांचं वक्तव्य
“तुमचा विकास करत असताना या गरीब शेतकऱ्यांवर अन्याय का होऊन द्यावा. मी स्वतः या शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. मात्र, तोपर्यंत तरी त्वरित युद्धपातळीवर मुख्यमंत्र्यांनी या समृद्धी महामार्गाकडे लक्ष घालून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात. लवकरच या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होणारा असून, त्यानंतर गाड्या चालू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी काय करावे. त्यांच्या समस्या कशा सोडवाव्यात,” असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.